Home चंद्रपूर बाजारहाट’ चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास

बाजारहाट’ चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास

‘बाजारहाट’ चंद्रपूर जिल्ह्यासाठी कृषी क्रांती घडविणारा प्रकल्प

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विश्वास

80 कोटी रुपयाचे बाजारहाट व अनुषंगीक कामांचे भूमिपूजन

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर, दि. 16 : जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असून बळीराजाला सुखी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. ग्रामीण व नागरी भागात काम करणारे बचत गट, शेतमाल उत्पादक कंपन्या आदी संस्था गाव-खेडयांना आर्थिक संपन्नतेकडे नेणाऱ्या आहेत. या संस्थाना, शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आत्मनिर्भर करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ठिकाणी 80 कोटी रुपये खर्चून तयार होणारी बाजारहाट शेतकरी कल्याणाचा मार्ग सुकर करणारा आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा हा प्रकल्प जिल्ह्यासाठी एक नवी कृषी क्रांती घडवेल, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.*

कृषी भवन येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजारहाट व इतर कामांचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, प्रकल्प संचालक (आत्मा) प्रीती हिरुळकर, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, रामपाल सिंग आदी उपस्थित होते.

नागपूर मार्गकडे या पुलावरून जाताना कृषी विभागाच्या जागेवर कृषी व शेतकरी हिताचा एखादा प्रकल्प पूर्णत्वास जावा असे मला नेहमी वाटायचे, असे सांगून ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘कृषी विभागाच्या जागेवर बाजारहाट तर महानगरपालिकेच्या उर्वरित जागेवर केंद्र शासनाच्या माध्यमातून ई-बसेसचे स्थानक करण्यात येत आहे. बस सुविधेमुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल 25 कि.मी.च्या परिसरात थेट विक्री करता येणार आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असा एक काळ होता. आता मात्र, त्यात बदल होतोय. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती 4.21 हेक्टर आहे. 1 कोटी 34 लाख शेतकऱ्यांपैकी 1 कोटी 7 लाख शेतकरी अल्पभूधारक आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये धान, कापूस व सोयाबीन या तीन प्रकाराची शेती शिल्लक राहिली आहे.’

*कृषी विकासाची पंचसूत्री:*
चंद्रपूर जिल्हा हा शेतीमध्ये आदर्श ठरावा यासाठी अनेक निर्णय करण्यात आले आहे. स्व. वसंतराव नाईक यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पंचसूत्रीनुसार काम करण्याची गरज आहे. सर्वप्रथम विकेल तेच पिकेल यावर भर देण्याची आवश्यकता आहे. वरोरा तालुक्यातील एकार्जुना येथे डॉ. पजांबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत उच्च तंत्रज्ञानयुक्त भाजीपाला संशोधन केंद्र स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामीण विकासाकरीता 5003 कि.मी.च्या पाणंद रस्त्याचा निर्णय करण्यात आला असून 1 हजार कि.मी.चे पाणंद रस्ते टॅकल करण्यात येत आहेत. पाणंद रस्ते निर्मीतीत भारतातील चंद्रपूर एकमात्र जिल्हा राहिल, असेही ते म्हणाले.

“वन प्रोडक्ट वन स्टेशन’ करण्याची गरज आहे. यासाठी शेतकऱ्यांना कृषी विषयक उत्तम ज्ञान देणारे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. शेती यांत्रिकीकरणाच्या बाबतीत केरळच्या धर्तीवर प्रयोग करण्यात येत आहे. बचत गट, युवा फोर्स व यांत्रिक शेती यावर भर देण्यात येत असून शेतीसोबत जोडधंदा, मत्स्यसंवर्धनाचे मॅपींग करण्यात येणार आहे. तसेच सर्वकंष शेती कशी करता येईल याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे. मिशन जयकिसान अतंर्गत क्रांतीकारी मिशनचा एक टप्पा पुर्ण करीत असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले. शेतीचा व्यवसाय मजबुरीचा नाही तर मजबुतीचा करण्यावर भर देण्यात येत आहे. उत्पादन खर्च कमी व उत्पादकता जास्त यादृष्टीने पुढे पाऊल टाकत मार्केंटींग, बाजारपेठ, विपणन आणि पॅकेजिंग यावर लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. मुल येथील कृषी महाविद्यालय भविष्यात कृषी विद्यापीठ होईल. असा विश्वास देखील ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

*शेतकरी व बचतगटासांठी सुसज्ज बाजारहाट:*
78 गाळयांचे सुसज्ज बाजार हाट, 425 आसन क्षमतेचे सुसज्ज वातानुकुलीत सांस्कृतिक सभागृह, 125 आसन क्षमतेचे सुसज्ज वातानुकुलीत प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज मृद परिक्षण प्रयोगशाळा, आत्मा कार्यालय, नर्सरी कार्यालय, टि.एस.एफ. कार्यालय, 100 व्यक्ती क्षमतेचे भोजन व उपहार गृह, सिमेंट काँक्रीट पोचमार्ग, संरक्षण भिंत, खुले रंगमंच, अतिरिक्त फुड सुविधा, अंतर्गत सिंमेंट काँक्रीट रस्ते, सार्वजनिक सुविधा व सोलर / विद्युत यंत्रणा अद्ययावत करण्याची कामे होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here