जटपुरा सराई मार्केट जागेतील दत्तू कंचर्लावार यांच्या अतिक्रमणाची तक्रार दिल्यानंतर सुद्धा आयुक्तांची त्यावर कारवाई का नाही?
मनपाचा भोंगळ कारभार भाग-२२
चंद्रपूर मनपा मधे राखी कंचर्लावार ह्या महापौर झाल्यापासून शहरातील अनेक मोक्याच्या जागेवर त्यांच्या कुटुंबीयांनी जे अतिक्रमण व अवैध बांधकाम केले त्या संदर्भातील बातम्यांची मालिका भूमिपूत्राची हाक न्यूज पोर्टलवर सुरू आहे, महत्वाची बाब म्हणजे सत्ता असल्यावर आपलं कोणी काहीही बिघडवु शकत नाही ह्या तोऱ्यात व भ्रमात कंचर्लावार कुटुंबीय आपले अवैध अतिक्रमण व बांधकाम चंद्रपूर मनपा आयुक्त राजेश मोहीते यांच्या आशीर्वादाने अबाधित ठेवून आहे, खरं तर एकीकडे सर्वसामान्य जनतेचे अतिक्रमण व अवैध बांधकाम तोडण्यासाठी आयुक्त त्वरित आदेश देतात तर मग कंचर्लावार यांच्या कुटुंबीयांचे अवैध अतिक्रमण व बांधकाम आयुक्त का तोडत नाही ? हा मोठा सवाल असून आयुक्तांच्या या एकतर्फी भूमिकेमुळे ते महापौर कंचर्लावार यांच्याकडे चाकरी करताहेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कंचर्लावार कुटुंबीयांनी चंद्रपूर शहरात अनेक मोक्याच्या जागांवर अतिक्रमण व बांधकाम केले, त्यामुळे उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊन त्यांचे नगरसेवक पद व पर्यायाने सत्ता पण जाणार आहे, परंतु जनतेच्या सेवेसाठी काम करण्यासाठी आयुक्तांना शासन पगार देते त्या जनतेच्या छोट्याशा अवैध बांधकामाला तोडण्याची घाई करणारे आयुक्त कंचर्लावार यांचे अवैध अतिक्रमण व बांधकाम वाचवून काय साध्य करीत आहे ? हा तेवढाच महत्वपूर्ण प्रश्न असून सत्तेचा दुरुपयोग करून अवैध अतिक्रमण व बांधकाम करणाऱ्या कंचर्लावार कुटुंबीयांना ज्या पद्धतीने आयुक्त वाचविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे ही बाब चंद्रपूर शहरातील जनतेच्या मनात उद्रेक निर्माण करणारी ठरत आहे, कारण सत्ताधारी याना एक कायदा आणि सर्वसामान्यांना दुसरा कायदा हा जो प्रकार चंद्रपूर मनपा मधे सुरू आहे तो लोकशाहीला बाधक ठरणारा आहे.
सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी दत्तू कंचर्लावार यांच्या जटपुरा येथील जनार्धन मेडिकल मागील चंद्रपूर मनपाच्या सराई मार्केट मधील जागेवर अतिक्रमण केले आहे ते तोडण्यात यावे अन्यथा मनपा कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू असा इशारा चंद्रपूर मनपा आयुक्त यांना दिला होता, परंतु दिनांक ७/९/२०२० ला दिलेल्या तक्रारीची दखल अजूनपर्यंत आयुक्तांनी घेतली नाही मग राजेश बेले यांचे घर ते कोरोना पॉझिटिव्ह असताना व कोरोनटाईन सेंटर वर असताना का तोडले ? याचा अर्थ सत्ताधारी यांना अवैध अतिक्रमण व बांधकामाची खुली सूट आणि सर्वसामान्यांच्या घरांवर बुलडोजर ? हा कसला न्याय ? काय माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठीच राखी कंचर्लावार यांना महापौर बनविले ? आपलं ठेवायचं झाकून व दुसऱ्याच बघायचे वाकून ?