अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- ऑक्टोबर महिन्यात चंद्रपूर मनपातील कंत्राटी घंटागाडी कामगार यांनी किमान वेतनासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले होते, 10 ते 12 दिवस चाललेल्या आंदोलनानंतर स्वतः मनपा आयुक्तांनी कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देणार अशी माहिती देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती, आंदोलन मागे घेतल्यावर कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार पगार जमा झाला नाही.
याबाबत संत गाडगेबाबा असंघटित कामगार संघटनेने महानगरपालिकेला स्मरण पत्र दिले, 1 नोव्हेम्बर रोजी कामगारांचा पगार किमान वेतन कायद्यानुसार जमा करण्यात येणार असे आश्वासन कामगारांना देण्यात आले. मात्र पगार जमा झालाच नाही, कामगारांचा पगार जमा करावा अन्यथा 6 नोव्हेंबर पासून कामबंद आंदोलन करू असा इशारा कामगारांनी मनपा प्रशासनाला दिला होता.
त्यांनतर सुद्धा कामगारांच्या मागणीकडे मनपाने दुर्लक्ष केल्याने तब्बल 300 मनपा कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलन 6 नोव्हेम्बर पासून सुरू केले. कामगारांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.