अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर :- भारतीय हवामान विभागाने १९ व २० जुलै रोजी चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यासाठी ऑरेंज अर्लट दिला असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास चंद्रपूर, वर्धा, वना, बोर, पोथरा, यशोदा, धाम, लालनाला आदी नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊन पाणलोट क्षेत्रात नद्या व नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागरिकांनी वीज गर्जना होत असतांना शक्यतो घराबाहेर पडू नये. घराबाहेर असल्यास झाडाखाली उभे राहू नये. एखाद्या सुरक्षित स्थळी आसरा घ्यावा. नदी व नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असेल तर धाडस करुन कुठल्याही प्रकारे पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. नदी, धरणाकाठी वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. तसेच इशारा कालावधीत पर्यटन स्थळांवर गर्दी करु नये. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नये. घडलेल्या घटनेची माहिती तात्काळ जिल्हा किंवा तालुका नियंत्रण कक्षास द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केले आहे.