विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषदेत मागणी
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर : खारघर येथे १६ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्यात १४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. राज्य सरकारने सोहळ्यासाठी १३ कोटी खर्च करूनही श्री सदस्यांना उन्हात बसावे लागले. सरकारच्या डिसाळ नियोजनामुळेच त्यांचे हकनाक बळी गेले. याप्रकरणी तात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.
आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, श्री सदस्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून साधे छत लावण्याची तसदी राज्य सरकारने घेतली नाही. पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही. उष्माघाताने अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. धक्कादायक बाब म्हणजे सोहळ्याप्रसंगी चेंगराचेंगरी
झाल्याच्या बातम्याही प्रसार माध्यमांतून येत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे १४ जणांचा मृत्यू झाला ५०० पेक्षा जास्त उपचार घेत आहेत. हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा असताना मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत देऊन सरकार सत्य परिस्थिती लपवत आहे, असा आरोपही आमदार वडेट्टीवार यांनी केला.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) प्रकाश देवतळे, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, विनोद दत्तात्रेय माजी महापौर संगीता अमृतकर उपस्थित होते.