Home Breaking News मान्सून विदर्भात दाखल पण उलटा प्रवास सुरु,हवामान विभागानं जे सांगितलं ते घडलं?

मान्सून विदर्भात दाखल पण उलटा प्रवास सुरु,हवामान विभागानं जे सांगितलं ते घडलं?

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  मृग नक्षत्रात दडी मारून बसलेला पाऊस आर्द्राच्या आगमनापासून बरसू लागला आहे. शुक्रवारी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मान्सून धडकला. अकोला आणि बुलढाणा वगळता इतर नऊ जिल्ह्यांमध्ये दमदार सरी कोसळल्या. उद्या, रविवारपर्यंत मान्सून संपूर्ण विदर्भ व्यापणार असल्याचा अंदाज आहे. या पावसामुळे तप्त उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या वैदर्भीयांना दिलासा मिळाला आहे.

नागपुरात सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. अकरा वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. दुपारीही तुरळक सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने तापमानात कमालीची घट नोंदविण्यात आली. मान्सूनचे आगमन झाल्याने चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने सखल भागात पाणी साचले गोंदियाचा अंडरग्राउंड पूल दीड तासाच्या पावसामुळे जलमय झाला होता. वर्धा जिल्ह्यातील सेलू, देवळी, हिंगणघाट तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अमरावतीत दमदार तर यवतमाळ जिल्ह्यात तुरळक सरी कोसळल्या. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

                       पश्चिम सोडून पूर्वेतून प्रवेश

केरळमध्ये साधारणतः १ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होते. हवामान विभागाने यंदा ४ जूनचा अंदाज वर्तविला. पण, मान्सून १० जूनला दाखल झाला. सामान्यतः दहा दिवस त्याला उशीर झाला. बिपर्जयमुळे वातावरण बदलून एरवी बुलढाण्यातून होणारा मान्सून प्रवेश यंदा होऊ शकला नाही. हा प्रवेश चंद्रपूर जिल्ह्यातून झाला आहे. त्यामुळेच विदर्भातील नऊ जिल्ह्यांत बरसणारा पाऊस बुलडाण्यापासून अजूनही दूर असल्याचे दिसून आले. दोन दिवसांत या जिल्ह्यातही मान्सूनचा प्रवेश होऊन पावसाच्या दमदार सरी कोसळण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here