घाटावरून बेकायदेशीर रेती साठा उचलण्याची परवानगी दिल्याने घाटधारक व ठेकेदार यांनी नदी पात्रातून रेती उत्खनन करत असताना उठला होता वाद.
चंद्रपूर :-
गोंडपिपरी तालुक्यातील वादग्रस्त कुलथा रेती घाटावर रेती घाटधारक अक्षय चांदेकर आणि शिवसेनेच्या वाहतूक जिल्हा प्रमुख स्वप्नील काशीकार व इतरांनी नदी पात्रातून रेती उत्खनन करताना विरोध करण्यासाठी आलेल्या तारडा सरपंच तरुण गंगाराम उमरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष चंद्रशेखर सुधाकर लखमापूरे व ग्रामपंचायतच्या महिला सदस्य यांच्यावर जीवघेणा हल्ला केला व गंभीर जखमी केले होते, हे गंभीर प्रकरण घडण्यामागे जिल्हा खाणीकर्म अधिकारी सुरेश नेताम, अतिरिक्त जिल्हाधिकारी देशपांडे हे दोषी असून त्यांनीच आरोपीना नदी पात्रातून रती उत्खनन करण्याची मूक संमती दिली असल्यानेच रेती घाट धारकांची एवढी हिंमत झाली, त्यामुळे मारहान करणारे जेवढे दोषी आहे तेवढे वरील अधिकारी पण दोषी आहे त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर सुद्धा आरोपी प्रमाणे कलम 307 व इतर कलान्वये गुन्हे दाखल करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा पुष्पाताई मोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी, हिवरा, विठ्ठलवाडा-येनबोधला, व कुलथा हे रेती घाट विवादीत असून त्या रेती घाटातून रेतीची उचल करून त्याची वाहतूक होतं असल्याने गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी यांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना पत्र क्र. गौख/मस/उविअ/2023/290 दि. 01/11/2023 अन्वये रेती घाट धारक व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती व त्या दरम्यान अप्पर जिल्हाधिकारी यांनी 16/11/2023 रोजी कुलथा रेती लिलाव घाट धारक अक्षय चांदेकर यांना कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावली होती, या दरम्यान चंद्रपूर येथे पकडलेला रेती ट्रक जो हिंगणघाटचा होता तो ट्रकचं चोरीला गेला होता व त्यात असलेली रेती ही गोंडपिपरीच्या घाटावरील असल्याची माहिती होती, त्याच दरम्यान विठ्ठलवाडा रेती घाटावर अमजद खान यांची पोकलेनं मशीन उपविभागीय अधिकारी यांनी पकडली पण ती नंतर वरिष्ठाच्या आदेशाने ती सोडली असल्याची माहिती समोर आली होती, याच काळात अप्पर जिल्हाधिकारी देशपांडे यांनी एक अफलातून आदेश काढला की जिल्ह्यातील रेती घाट धारकांचा जो रेती साठा शिल्लक आहे तो 31 डिसेंबर पर्यंत उचल करावा, अर्थात अगोदरच बेकायदेशीरपणे नदी पात्रातून रेती उपसा करणाऱ्या रेती घाट धारकांना रेती घाटातून रेती उपसा व वाहतूक कारण्याची संधी अप्पर जिल्हाधिकारी व खनिकर्म अधिकारी या महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यानी दिली असल्यानेच कुलथा घाटातून रेती उपसा करताना गावाकऱ्यांनी घाट धारकांना पोकलेनं मशीन सह हायवा ट्रक पकडले त्यामुळे त्या गावकऱ्यावर जीवघेना हल्ला झाला, अर्थात या प्रकरणाला अप्पर जिल्हाधिकारी व खनिकर्म अधिकारी दोषी असल्याने त्यांच्यावर सुद्धा सहआरोपी म्हणून गुन्हे दाखल करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
काय होता अप्पर जिल्हाधिकारी यांचा कुलथा घाट धारकांना कारणे दाखवा नोटीस?
अप्पर जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने कुलथा घाट धारकाला पाठविण्यात आलेल्या नोटीस मध्ये म्हटल्या गेले को “सन 2022-23 मध्ये गोंडपीपरी तालुक्यातील मौजा आर्वी, हिवरा, विठ्ठलवाडा-येनबोधला, व कुलथा हे चार रेतीघाट लिलावात विक्रीस गेले होते. त्यापैकी मौजा कुलथा रेतीघाट आपणास 70,00,000/- मध्ये लिलावात दिलेला आहे. सदर घाटाची रेतीघाटातून उत्खनन करण्याची मुदत ही 10 जून, 2023 असून रेतीघाटाची मुदत 30 सप्टेंबर, 2023 होती. याबाबत आपणास विक्रेत्याचे लायसन सुध्दा वाहतूक व विक्री करण्यास वितरीत करण्यात आलेले नाही.
उपविभागीय अधिकारी, गॉडपीपरी यांनी दिनांक 23/10/2023 रोजी गॉडपीपरी तालुक्यातील मौजा आर्वी, हिवरा, विठ्ठलवाडा व कुलथा या चारही रेतीघाटावर व रेतीसाठयास त्यांचे अधिनिस्त नायब तहसिलदार यांचे समवेत भेट दिली असता मौजा कुलथा ता. गोंडपीपरी या रेतीघाटावर तात्पुरते सिमांकन केले असून तिथे Boundary Pillar लावलेले नसल्याचे निदर्शनास आले. उपरोक्त निदर्शनास आलेल्या बाबींवरुन मौजा कुलथा येथील रेतीसाठ्यावरुन अवैध रेतीची वाहतूक होत असल्याचे संदर्भीय पत्रानुसार या कार्यालयाचे निदर्शनास आणूण दिले आहे.
यावरुन असे निदर्शनास येते की मौजा कुलथा रेतीघाटाचे करारनाम्यानुसार अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याचे दिसून येते. सबब अवैध वाहतूक प्रकरणी आपणा विरुध्द महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 मधील नियम 48 (7) (8) नुसार दंडात्मक कार्यवाही का करण्यात येवू नये? तसेच आपण कुलथा रेतीघाटाकरीता या कार्यालयात जमा केलेली बँक गॅरंटी व अनामत रक्कम जप्त का करण्यात येऊ नये? याबाबत आपला खुलासा हे नोटीस मिळताच 7 दिवसाचे आत समक्ष सादर करावे. अन्यथा याबाबत आपले काहिच म्हणणे नाही असे समजून पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे कारणे दाखवा नोटीस मध्ये नमूद करण्यात आले होते.
काय आहे सत्य परिस्थिती?
कुलथा या रेतीघाटावरून यांना 3534 ब्रास रेती उत्खनन करण्याची परवानगी मिळालेली होती, याच्या दहापट रेती त्यांनी आधीच उचलून मोठ्या प्रमाणात तस्करीच्या माध्यमातून काळ्या बाजारात विकली, या रेती घाटावरून पूर्वी झालेले उत्खनन याचे सीसीटीव्ही फुटेज आणि स्टॉक यार्डवरचे सीसीटीव्ही फुटेज तसेच रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची जीपीएस ट्रेकिग इत्यादीची तपासणी केली असता सदर गोडबंगाल पुढे येणार आहे, परंतु सीसीटीव्ही कॅमेरे न लावता दिवस रात्र रेती घाटावरून नदीपात्रातून रेतीचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून व पर्यावरणाची हानी करून सदर माफियाराज रेती तस्करांच्या माध्यमातून उफाळलेला आहे, या सर्व प्रकरणाची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नेताम यांना असते, यांच्या कार्यालयामधूनच रेतीमाफीया यांना नवनवीन युक्त्या आणि नवनवीन पद्धतीने रेती घाटावरून रेती चोरी करण्याच्या उपाययोजना सुचवल्या जातात, कारण या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार महसूल अधिकारी आणि रेतीमाफियांच्या दरम्यान झालेला असतो, त्यामुळे एक प्रकारे महसूल अधिकारी आणि जिल्हा खणीकर्म अधिकारी सुरेश नैताम हे रेती तस्करांचे मार्गदर्शक आहे हे नेहमीच पाहायला मिळाले आहे, दरम्यान कोणत्याही रेती घाटधारकांकडे एक ब्रॉस रेती घाटावर शिल्लक नसताना सुद्धा त्यांनी केलेल्या सुनियोजित कट कारस्थानाने मंजूरीच्या दहापट पेक्षा जास्त रेती आधीच उत्खनन करून सीसीटीव्ही कॅमेरे न लावता या चोरल्या गेली आणि यानंतर सुद्धा ऐन नवीन रेती घाट लिलावाची वेळ आल्यानंतर व शासनाला कोट्यावधी रुपयाचा महसूल मिळत असताना जुना रेती साठा घाट धारकांना बेकायदेशीरपणे मोफत देणे म्हणजे अप्पर जिल्हाधिकारी व खनिकर्म अधिकारी यांनी रेती घाट धारकांकडून माया घेतल्याशिवाय शक्य नाही, त्यामुळे मारहान प्रकरणात ते तेवढेच दोषी आहे जेवढे रेती घाट धारक आहे, म्हणून त्यांच्यावर सुद्धा आरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही पुष्पा मोरे यांनी केलेली मागणी न्यायोचित आहे.