चंद्रपूर जिल्ह्यात उष्मालाट, आजपासून दोन दिवस येलो अलर्ट जारी
खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आव्हान
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढत असून उष्मालाटेच्या अनुषंगाने दि. 29आणि 30 मे रोजी जिल्ह्याकरीता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उष्माघाताची शक्यता असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जे नागरीक घराबाहेर बराच वेळ घालवतात त्यांना उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतील तर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास उष्णता जीवघेणी ठरु शकते. जेव्हा शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते आणि शरीराची शीतकरण यंत्रणा योग्यरित्या कार्य करण्यास अपयशी ठरते तेव्हा ही स्थिती उद्भवू शकते. शरीराचे उच्च तापमान, अनेकदा 104 अंश फॅरेनहाईट (40 अंश) पेक्षा जास्त असते. यामुळे गोंधळ, चक्कर येणे आणि मळमळ होऊ शकते. नाडीचे ठोके वाढणे आणि डोकेदुखी ही देखील सामान्य लक्षणे आहेत. गंभीर प्रकरणांमध्ये बेशुद्ध पडणे किंवा झटके येऊ शकतात. ही लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.