एकीकडे आनंद तर दुसरीकडं एक मार्गदर्शक दूर गेल्याचं दुःख, अनेकांनी व्यक्त केला भावना !
आभास चंद्रसिंह नवे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून वेकोलि वणी क्षेत्रात रुजू.
विशेष बातमीपत्र :–
वेकोली वणी क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक उदय कावळे यांची पदोन्नती झाल्याने त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला असला तरी दुसरीकडं त्याच चाहत्यांचा मार्गदर्शक, एक मायाळू सवंगडी दूर गेल्याचं दुःख पण झालं आहे. चंद्रपुरात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या उदय कावळे यांनी विपरीत परिस्थितीत सुद्धा एक ध्येय समोर ठेऊन वेकोलित नौकरी मिळवली व आपल्या शिस्त व समर्पित कार्याने त्यांनी मुख्य महाव्यवस्थापक ते (DT) डीटी डायरेक्टर ऑफ टेक्निकल (BCCL) भारत कुकिंग कोल लिमिटेड, हेडक्वॉर्टर धनबाद असा यशस्वी प्रवास साध्य केला व ते लवकरच नागपूर च्या वेकोलि मुख्यालयात सिएमडी म्हणून नक्कीच झेप घेइल असा विश्वास त्यांच्या चाहत्यांना आहे. त्यांनी सर्वात मोठ्या कोळसा उत्पादन देणाऱ्या वेकोली वणी क्षेत्राचे मुख्य व्यवस्थापक असताना पुन्हा कोळसा उत्पादनात वाढ केली व त्या दरम्यान त्यांनी घेतलेले निर्णय वेकोलीला लाभदायक ठरले होते.
उदय कवळे वणी क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक असताना त्यांच्या कार्याने अनेकांच्या मनात आदर निर्माण झाला होता,कारणं मृदु व संयमी स्वभाव आणि कामात शिस्त यामुळे त्यांच्या विरोधात ओरड करण्याची कुणी हिंमत करत नव्हते, त्यांच्या काळातच कोळसा चोरीच्या अनेक घटनांना पायबंद लावण्यात ते यशस्वी झाले होते. कोळसा चोरीच्या घटनांमध्ये जे दोषी कर्मचारी होते त्यांच्यावर त्यांनी कारवाया केल्या व अतिशय शिस्तबद्ध प्रशासन व्यवस्था निर्माण करून वेकोलिच्या उत्पादनात वाढ व कोळसा चोरीला लगाम त्यांनी लावला व म्हणूनच उदय कवळे यांच्या नेतृत्वाखाली वणी क्षेत्राला सर्वोत्कृष्ट क्षेत्र, सुरक्षा आणि कोळसा उत्पादनात वाढ झाल्याने पुरस्कार मिळाले.
उत्तम प्रशासक म्हणून कामगिरी !
उदय कावळे यांनी वेकोलिच्या इतर क्षेत्रांतील कोळसा खाणी पेक्षा वणी क्षेत्राला दोन पाऊल पुढे नेले असेच म्हणावे लागेल कारण त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून डब्ल्यूसीएल (WCL) व (Coal India) कोल इंडियाकडून अनेक पुरस्कार त्यांच्या क्षेत्राला मिळाले आहेत. त्यांनी वणी क्षेत्रातील बंद खाणी सुरू केल्यात. वणी क्षेत्रातील विविध कोळसा खाणींमध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एमएसएफ (MSF) सुरक्षा दलांव्यतिरिक्त मुख्य रस्ते, चेकपोस्ट, काटा घर आणि कोळसा स्टॅकमध्ये हाय डेफिनेशनचे सीसीटीव्ही (HD CCTV cameras ) – बसविलेत. खाणी आणि त्याचे नियंत्रण ताडाळीच्या मुख्यालयातून त्यांनी नियंत्रित केले. नुकतेच जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांत वर्धा नदीला दोन वेळा पूर आला होता. त्यामुळे मुंगोली, कोलगाव, पैनगंगा खाणीतून उत्पादित होणाऱ्या हजारो टन कोळशाची वाहतूक पूर्णपणे बंद होती. तरी सूध्दा कोळश्याचा उत्पादनात आणि परिवहनात कुठेही कमतरता आली नव्हती. हे सर्व उदय कावळे यांच्या प्रशासकीय नियोजनामुळेच शक्य झाले.
कोरोनाच्या काळात बनले देवदूत.
कोरोनाच्या कठीण काळात जिथे रुग्णांना बेड मिळत नव्हते, कुठे व्हेंटिलेटर मिळत नव्हते अशा वेळी उदय कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील अनेक ग्रामस्थांना राजीव रतन हॉस्पिटलमध्ये नवीन कोविड केअर सेंटर मधे मोफत उपचार उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी कोरोनाच्या काळात जणू देवदूताची भूमिका निभावली हे मात्र खरे.
आभास चंद्रसिंह नवे मुख्य महाव्यवस्थापक
वेकोलि वणी क्षेत्रात आता मुख्य महाव्यवस्थापक पदावर असलेल्या उदय कावळे यांना पदोन्नती मिळाली असल्याने त्या जागेवर आता आभास चंद्रसिंह यांची वर्णी लागली आहे. चंद्रसिंह हे घुग्घुस आणि मुंगोली खाणींचे प्रादेशिक व्यवस्थापक म्हणून गेल्या दशकापासून कार्यरत होते. त्यांना वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. त्यांची दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2020 मध्ये वेकोलि नागपूर मुख्यालयात बदली झाली होती.