कोरोना लसीच्या परिणामांची कारणमीमांसा करणे आवश्यक?
भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी व चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील दोन डॉक्टर कोरोना बाधित झाले असल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर येथे घडल्याने कोरोना लसीच्या परिणामांची कारणमीमांसा करणे आवश्यक झाले असल्याच्या प्रतिक्रिया जनसामान्यांमधे आता उमटू लागल्या आहे.
चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर दाम्पत्यांनी २३ जानेवारी रोजी पहिला डोस घेतला. त्यानंतर २० फेब्रुवारीला दुसरा डोस घेतला. परंतु, काही दिवसातच त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली. त्यांनी तपासणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांना कोरोना चे लक्षणे असल्याने ते गृह विलगीकरणात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सुद्धा कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतरही ते पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आहे.
लस घेतल्यानंतरही ५७ दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी कोरोना होवू शकतो. परंतु, केवळ सौम्य लक्षणे असतात. तसेच धोका होण्याची शक्यता कमी असते. असे जिल्हा सामन्य रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक निवृत्ती राठोड यांचे मत आहे. पण जर कोरोना लस घेतल्यानंतर सुद्धा कोरोना ची लागण होत असेल तर मग ह्या लसीचे परिणाम एवढे प्रभावी होत नसल्याचे दिसत आहे.