तीन दिवस बलात्कार केल्यानंतर सुद्धा तिला अन्न पाणी दिले नसल्याने तरुणी गंभीर.
न्यूज नेटवर्क :-
देशात बलात्काराच्या घटना आता मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्या असून मुंबईच्या साकीनाका भागात एका 30 वर्षीय महिलेवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण ताजे असतानाच तिकडे छत्तीसगडमध्येही अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. एका 28 वर्षीय तरुणीला गोठ्यात बांधून रात्रभर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 सप्टेंबर रोजी पीडित तरुणी गावातील सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेली होती, पण रात्री उशीरापर्यंत ती घरी परतली नाही. यानंतर कुटुंबियांनी रात्रभर तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. अखेर दुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तात्काळ तपासाचे चक्र फिरवले आणि 15 सप्टेंबर रोजी तरुणी गावातील विजय कंवर नावाच्या व्यक्तीच्या घरातील गोठ्यात जखमी अवस्थेत सापडली.
घटनेचा तपास करताना पोलिसांनी सांगितले की तरुणीचे हात-पाय बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तसेच, तीन दिवसांपासून तिला अन्न-पाण्याचा कणही दिला गेला नव्हता. तरुणीची ती अवस्था पाहून पोलिसांचाच थरकाप उडाला. पोलिसांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले आणि पीडित तरुणीच्या साक्षीवरुन गावातील बाल वसतिगृहाचा अधीक्षक विजय कंवर (30), सरपंचाचा नातलग रामलाल कंवर उर्फ बल्ला ( 30) आणि हिरालाल (26) यांना अटक केली आहे.