पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून शिक्षिकेचा मृत्यू, 13 जन गंभीर जखमी
बल्लारपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर 40 वर्ष जुना पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून एका शिक्षक महिलेचा मृत्यू झाला तर 13 जण गंभीर जखमी असल्याची घटना समोर आली आहे.
आज जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. शिक्षिका असलेल्या 48 वर्षीय नीलिमा रंगारी यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेत 13 जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वांना तातडीची मदत करीत रेल्वे प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने रूग्णवाहिकेद्वारा रुग्णालयात पोहोचवून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
बल्लारपूर रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म नंबर 1 आणि 2 यांना जोडणारा हा पादचारी पूल असून संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान या पुलाचा एक भाग कोसळला. पादचारी पूलाचा भाग कोसळल्यानंतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेने ओव्हर हेड वायरसह पादचारी पुलाचा भाग पुन्हा एकदा दुरुस्त करण्याचं काम सुरू केलं आहे. या अत्यंत वर्दळीच्या स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. मोठ्या संख्येत रेल्वे कर्मचारी अभियंते रेल्वे स्थानकावर दाखल झाले आहेत.
हा पूल सुमारे 40 वर्ष जुना होता. सहा ते आठ महिन्यांपूर्वी या पुलाची पाहणी करण्यात आली होती. रेल्वे प्रवाशांच्या अधिकच्या वजनाने हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.