अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
मुंबई :- महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस चांगलाच बरसताना दिसत आहे. मंगळवारी मुंबई आणि नजीकच्या किनारपट्टी भागातून काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरीही हलक्या सरींनी शहराला ओलंचिंब केल्याचं पाहायला मिळालं. पुढील 48 तासांचा आढावा घ्यायचा झाल्यास, आयएमडीच्या वृत्तानुसार येणारे दोन दिवसही पावसाचेच असणार आहेत.
पुणे वेधशाळेचे महासंचालक के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार 5 आणि 6 जुलै दरम्यान राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 6 जुलैपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढणार असून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. तर, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे.