अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर : केंद्रशासन पुरस्कृत अमृत-2 अभियानांतर्गत चंद्रपूर शहरासाठी 270.13 कोटी रुपयांच्या वाढीव पाणी पुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनातून चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्णत्वास येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय नगर विकास विभागाने निर्गमित केला आहे.
केंद्राच्या अमृत दोन अभियानांतर्गत पाणीपुरवठा सरोवरांचे पुनरुज्जीवन व हरित क्षेत्र विकास इत्यादी पायाभूत सुविधांची निर्मिती राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येत आहे. यापुर्वीच्या अमृत अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील 44 शहरांमध्ये मलनि:सारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
त्यानुसार सदर अभियानांतर्गत राज्याच्या 18236.39 कोटी प्रकल्प किंमतीच्या राज्य जलकृती आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे. यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेचा पाणीपुरवठा प्रकल्प समाविष्ट व्हावा, यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून चंद्रपूर नगरातील नागरिकांसाठी उत्तम प्रकारे पाणी पुरवठा होण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.