अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- महानगरपालिकेमार्फत शहरातील सर्व नळ जोडणींवर जलमापक (मीटर) लावण्यात आले आहे. याचा प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतर पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच बिल येणार आणि अनावश्यक पाणी वापराला आळा बसणार, असा दावा महानगरपालिका प्रशासनाने केला आहे.
चंद्रपूर शहराला इरई नदी व धरणावरून पाण्याची उचल करून, रामनगर व तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया करून १६ जलकुंभांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराची गरज पाहता सध्या ४५ दशलक्ष लिटर पाण्याचे वाटप
मनपाद्वारे दररोज करण्यात येते. आतापर्यंत नळ जोडणीधारकांकडून वार्षिक पाणीपट्टी कर घेतला जात होता आणि तो सर्वांना सारखाच लागू होता, त्यामुळे पाण्याचा किती वापर प्रत्येकाकडून केला जातो याचा अंदाज बांधणे कठीण होते. आता मीटर सुरू झाल्याने आवश्यक तेवढेच पाणी वापरले जाऊन पाण्याचा अपव्यय टाळण्यास मदत होणार आहे.
जलमापक (मीटर) बसविल्याने पाण्याचा किती वापर करावा याचा अंदाज येईल, ज्याप्रमाणे आपण पैशासाठी मासिक अंदाजपत्रक तयार करतो. पाण्याचेही अंदाजपत्रक तयार केले तर पाण्याची बचत करता येऊ शकते, असा दावा मनपाने केला,
अशी बिल आकारणी
मीटरचा वापर १ जानेवारी २०२४ सुरु होणार असून, प्रेमासिक (तीन महिन्यांचे) बिल दिले जाणार आहे. बिल प्राप्त होताच १५ दिवसांत भरणाऱ्यांना १५ टक्के, त्यानंतरच्या १५ दिवसांत बिल भरणाच्या नळ जोडणीधारकांना ५ टक्के सवलत दिली जाईल, थकबाकी असल्यास २ टक्के व्याज लावले जाईल, अशी माहिती मनपाने दिली,
नळावर मीटर लावण्याचे कारण काय? अमृत योजना सुरू होण्यापूर्वी
शहरात ३५ हजार अधिकृत नळ कनेक्शन होते. योजनेंतर्गत वाढ होऊन ६० हजार झाले; परंतु त्या नळांना पाणी येत नव्हते. पाण्याचा दाब कमी येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. तपासणीअंती आढळले की, अनेक ठिकाणी उगीच नळ सुरू ठेवणे, वाहने धुण्यास पाण्याचा अपव्याय करणे, अशा निष्काळजीपणाने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता. सर्वांना पाणी मिळावे, यासाठी अपव्यय टाळणे आवश्यक होते. त्यामुळे मीटर लावण्याचा निर्णय मनपाने घेतला,