अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- आर्थिक व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वयोमर्यादा शासनाने जाहीर केली आहे.
३१ डिसेंबर २०२४ पर्यंत किमान सहा वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच पहिल्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.
या जागांवर प्रवेश देण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाच्या वतीने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. सत्र २०२४-२५ मध्ये आरटीई जागांवर विद्यार्थी प्रवेश देण्यासाठी आणि बालकाचे किमान वय निश्चित करण्यासाठी ३१ डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
अशी आहे पात्रता इथे बघा वयोमर्यादा
■ प्ले ग्रुप व नर्सरी १ जुलै २०२० ते ३१ डिसेंबर २०२१
■ ज्युनिअर केजी १ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२०
■ सीनिअर केजी १ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९
■ इयत्ता पहिली १ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८
जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून डिसेंबर २०२४ अखेरपर्यंतची वयोमर्यादा शिक्षण विभागाने निश्चित केली आहे. प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये प्रवेश देण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी किमान तीन वर्षे आणि कमाल चार वर्षे सहा महिने वय असणे आवश्यक आहे.
ज्युनिअर केजीसाठी किमान चार वर्षे आणि कमाल साडेपाच वर्षे वय असणे बंधनकारक आहे. याशिवाय सीनिअर केजीसाठी किमान पाच वर्षे आणि कमाल साडेसहा वर्षे वय असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.