Home महाराष्ट्र गंभीर :- महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात हिंदी अनिवार्य कराल तर याद राखा, राज...

गंभीर :- महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात हिंदी अनिवार्य कराल तर याद राखा, राज ठाकरे यांची डरकाळी.

इकडे मंत्री संजय शिरसाट यांचा जावई शोध, आयबिएन लोकमत च्या चर्चेत म्हणाले हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा?

मुंबई /चंद्रपूर न्यूज नेटवर्क :-

महाराष्ट्र राज्यात शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक काढून स्पष्ट शब्दांत सांगितले की हिंदीची ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही. केंद्र सरकारचे सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती एक देशातील इतर भाषांसारखी राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावर प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे का प्रकार सुरु झालेत? हा प्रश्न उपस्थित करून राज ठाकरे यांनी भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच यामुळे हरताळ फासला जाईल अशी शंका उपस्थित केली.

प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते. आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे. पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही असेही राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले.

मंत्री संजय शिरसाट यांचा जावई शोध?

नुकत्याच IBN News 18 लोकमत वर झालेल्या चर्चेत मंत्री संजय शिरसाट म्हणाले हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. असे वक्तव्य करून जावई शोध केला आहें, खरं तर आपल्या राज्यातील मंत्री जर जावई शोध लावायला लागले. तर परप्रांतीयांना महाराष्ट्र आंदण म्हणून दिलाय असं समजायला हरकत नाही. जर मंत्र्यांना भाषेचे ज्ञान नसेल व केवळ केंद्रात भाजप सरकार च्या तालावर नाचत असेल तर राज्यात हे सरकार नपुसंक आहें हे स्पष्ट होते, कारण सरकार मध्ये बसलेले सर्व मराठी भय्यै केंद्राच्या तुकड्यावर तर जगत आहेत असेच एकूण चित्र आहें.

तर संघर्ष अटळ आहें.

राज ठाकरे म्हणाले की आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे. येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्द मराठीतर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरु आहे? या राज्यातील अमराठी भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा. त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही. त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.

काय आहें राज्य सरकारची कुटणीती आणि लाचारी?

आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे, सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही, मराठी तरुण-तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं, पण पुढे ती केलीच नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे. आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे. जेंव्हा सांगण्यासारखं किंवा ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं, तेंव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय, अशी शंका यावी अशीच पाऊलं सरकारकडून उचलली जात आहेत.

खरं तर हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात केंद्र सरकार कडून केल्या जाईल का ? आणि जर केली तर अगोदर तिथली सरकारंच पेटून उठतील पण इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात कारण यांची ही लाचारी आहें म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे. पण बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही आणि आम्हाला देणंघेणं पण नाही, परंतु हिंदीची सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही अशी डकाळी राज ठाकरे यांनी फोडली.

आदेश मागे घ्या अन्यथा…मनसेचा हा आहें इशारा?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात इशारा देतांना नमूद केले की महाराष्ट्रात जर पहिलीपासून हिंदी भाषा शिकण्याची सक्ती इथे कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तकं विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत, याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी.

प्रत्येक राज्यात फक्त त्यांच्या राजभाषेचाच मान राखला गेला पाहीजे ! उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिली पासून शिकवाल का? नाही ना? मग ही जबरदस्ती इथेच का? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहें.

पण या आवाहनाला आव्हान देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील. त्यामुळे सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत असे त्यांनी सरकार ठणकावून सांगितले.

म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना, भगिनींना आणि बांधवांना तसेच मराठी वर्तमान पत्रात आणि मराठी टेलिव्हिजन चॅनल्स मध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती केली की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा! आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील. कारण आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो ! असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here