मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागणी.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्रात रविवारी दिनांक ४ मे ला संच क्रमांक आठ व नव मध्ये कोळसा हाताळणी विभागात आग लागली त्यावर नियंत्रण मिळविण्यास अधिकाऱ्यांना यश आले असले तरी या आगीचे कारण हे अजूनही स्पष्ट झालेले नाही, परंतु मिळवलेल्या माहितीनुसार त्या संचाचे कोळसा हाताळणीचे कंत्राट हे कुणाल एंटरप्राइजेस ला दिले असून त्याच्या हलगर्जीपणा व पैसे वाचविण्यासाठी नादात तो कंत्राटदार रात्री पाळीचे कामगार नियुक्त करीत नाही. त्यामुळेच कंत्राटदाराच्या नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची तेथील देखरेख व साफसफाई चे काम असलेले कर्मचारी त्या वेळी तिथे उपस्थित नसल्याने ही घटना घडली आहे, त्यामुळे काही पैसे वाचविण्याच्या प्रयत्नाने हा अपघात या ठिकाणी घडला असे निदर्शनास येते. रात्री पाळीची ड्यूटी न लावता फक्त दिवसा अधिकाऱ्यांना दाखवण्याकरिता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे ही बाब गंभीर असून यापुढेही असे अपघात झाल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे करोडो रुपये खर्च करून त्या ठिकाणी बसवलेले आगीपासून सुरक्षा करणारे पाणी फवारणी यंत्र सुद्धा कार्यरत नव्हते व त्याची दबावाची क्षमता कमी असल्याने ही घटना त्याठिकाणी घडल्याचे समजते, जर एवढे करोडो रुपये खर्च करून ते यंत्रच कामात येत नसेल तर त्यातही मोठा भ्रष्टाचार समोर येऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने हा प्रकार घडला असल्याने भविष्यात अनेक नाव समोर येईल, म्हणून कुणाल एंटरप्राइजेस चे मालक व संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसह भविष्यातील होणारे अपघात टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी व कुचकामी पडलेले यंत्र काढून नवीन यंत्र बसविण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर यांच्यातर्फे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.
तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले. यावेळी चौकशी सुरू असून अधिक माहिती मिळाल्यास आम्हाला ती माहिती देण्यात यावी असे आव्हान मुख्य अभियंता सपाटे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना केले यावेळी मुख्य अभियंता सपाटे यांच्याशी चर्चा करून दोषींवर त्वरित व कडक कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात असे कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही. यामुळे या घडलेल्या प्रकारात कठोर कारवाई होणे गरजेचे आहे अशी मागणी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष विवेक धोटे हे उपस्थित होते.