माझं कुणी काहीच बिघडवू शकत नसल्याच्या वल्गना करणाऱ्या ढेंगळेवर कुणी घातली आवर ?
वरोरा प्रतिनिधी :-
पापाचा घडा शेवटी भरतोच असे म्हटल्या जाते ते सत्य पुन्हा एकदा समोर आले आहे, वरोरा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश उर्फ चिरकुटा ढेंगळे यांनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लबाडी करून मातीमोल भावाने विकत घेतल्या त्या जमीनीच्या खरेदी व्यवहार बाबत अनेक प्रकरणे न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, बिचाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक कमजोरीचा फायदा घेत त्यांची फसवणूक करणाऱ्या ढेंगळे यांच्यावर संताप व्यक्त होतं असतानाच आता अशाच एका शेतीच्या वादातून अमृत पांडूरंग आगलावे (६१) या वृध्द शेतकऱ्यावर त्यांनी व त्यांच्या पत्नीने प्राणघातक खुनी हल्ला केला होता व चंद्रपुरातील एका खासगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांचावर उपचार सुरू होता. त्यानंतर तब्बल 12 दिवसांनंतर अविनाश उर्फ चिरकुटा ठेंगळे यांना वरोरा पोलिसांनी अटक करून काल न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने त्यांची चंद्रपूर च्या मध्यवर्ती जेल मधे रवानगी केली आहे.
वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथील शेतात सुरू असलेले बांधकाम बघण्यासाठी अमृत पांडूरंग आगलावे (६१) या वृध्द शेतकरी गेले होते दरम्यान जुन्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चिरकुटा गोपाळ ढेंगळे व त्याची पत्नी वंदना चिरकुटा ढेंगळे यांनी प्राणघातक हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेची तक्रार वरोरा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी फिर्यादी यांना सहकार्य न करता आरोपी ढेंगळेना सहकार्य करीत थातूरमाथूर कारवाई केल्याचा आरोप अमृत आगलावे यांची मुलगी अर्चना गाडगे यांनी दि. १९ नाव्हेंबरला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत केला होता. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांच्याकडे चौकशी दिली असता त्यांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन आरोपी ढेंगळेवर कलम 324 शिवाय आणखी 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करून अटक केली.
का मिळाली न्यायालयीन कोठडी ?
अमृत पांडूरंग आगलावे (६१) या वृध्द शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष चिरकुटा गोपाळ ढेंगळे यांच्यावर वरोरा पोलीस स्टेशन मधे कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पण या गुन्ह्यात सहज जमानत मिळत असल्याने आपण एवढी मारहाण केल्यानंतर सुद्धा माझं कुणी काही वाकडं केलं नसल्याच्या वल्गना करून आगलावे परिवारासह इतर शेतकऱ्यांमधे दहशत निर्माण करण्याचे काम त्यांनी केले होते व सगळीकडे ते फिरून आपण कसे डॉन आहोत हे सांगत सुटले होते मात्र नियती कुणाला कधी माफ करत नाही त्यामुळे शेवटी त्यांच्या पापाचा घडा भरला आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांनी प्रामाणिक तपास करून ढेंगळे यांना अटक करून अमृत पांडूरंग आगलावे यांच्या परिवाराला न्याय दिला. दरम्यान ढेंगळे यांना काल न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आणि ढेंगळे यांचा घमंड चकनाचुर झाला.