अतिवृष्टी आणि परतीच्या पावसानं सोयाबीन पिकांचा झाला पाचोळा. आता सरकारच्या नुकसानभरपाईची प्रतीक्षा,
शेतकरी वार्ता :-
दरवर्षी दसऱ्याच्या सणाला शेतकरी सोयाबीन विकून हा सण मोठ्या हर्ष ऊल्हासात साजरा करायचे पण यावर्षी अनेकांच्या घरी शेतातून सोयाबीनचा दानाही आला नाही. काहींच्या घरी आले ते ही कुजलेले व खराब झालेले सोयाबीन ज्याची बाजारात किंमत नाही आणि विशेष म्हणजे उत्पादन खर्च सुद्धा त्यापासून निघाला नाही, एकरी तीन ते चार क्विंटलच्या वर कुणालाही सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. तर दुसरीकडे कपाशीचा पहिला फ्लॅश गळाला. काही शेतात बोंडं काळी पडली. काही ठिकाणी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. ब्राऊन फ्रुट रॉट बुरशीमुळे मोसंबीची फळं गळली. आता अंबिया बहाराच्या संत्र्याची फळ गळती सुरू झाली. या संकटाच्या काळात नवरात्र उत्सव आणि दसरा उत्सव व पुढे दिवाळी आहे, शेतातून घरी सोयाबीनचा दाना किंवा कापसाचे बोंडही आले नाही तर दुसरीकडे धानाचे पीक तुडतुड्यांमुळे नष्ट होत आहे. या विपरीत परिस्थितीत जवळ पैसा नसताना रबी हंगामाची तयारी सुरू झाली. मात्र शेतकऱ्यांच्या पिकांचे होत्याचे नव्हतं झाले. आता या संकटाच्या काळात सरकार तर सोडा देवही शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येत नाही.या अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने हेक्टरी 25 हजार जाहीर केले पण “लबाडाच आवंतन जेवल्यावरच खरं” अशी परिस्थिती आहे.त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच होईल अशी परिस्थिती दिसत आहे.