Home भद्रावती धक्कादायक :- विजेचा पुनः कहर चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून दोन ठार तर...

धक्कादायक :- विजेचा पुनः कहर चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून दोन ठार तर एक जखमी.

नागपूर जिल्ह्य़ातील हिंगणा (सातनवरी) येथील एक शेतकरी ठार.

चंद्रपूर /नागपूर

या वर्षी संततधार पावसाने अगोदरच शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असताना आता नैसर्गिक प्रकोप सुद्धा वाढला आहे व वीज पडून मरणाऱ्याची संख्या वाढत आहे. चंद्रपूर जिल्हातील वरोरा तालुक्यात चार दिवसांपूर्वी वायगाव भोयर येथील एकाच कुटुंबाच्या चार महिलांचा वीज पडून दुर्दैवी म्रुत्यु झाला. त्यांची चर्चा महाराष्ट्रात झाली व सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली होती आता पुन्हा विजेने कहर केला असून पुन्हा चंद्रपूर जिल्हय़ातील दोघांचा वीज पडून म्रुत्यु झाल्याने निसर्गाचा हा प्रकोप थांबणार तरी कधी असा प्रश्न निर्माण होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर जिल्ह्य़ातील भद्रावती तालुक्यात चिचोर्डी शिवारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला. यासोबतच जिवती तालुक्यातील शेडवाही शिवारातही वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. हिंगणा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सातनवरी (पादरी खापा) शिवारात बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वीज कोसळल्याने होरपळून उज्ज्वला सुरेश थुटूरकर (४०, रा. सातनवरी, ता. नागपूर, ग्रामीण) या महिलेचा मृत्यू झाला.

थुटूरकर कुटुंबीय शेतात असलेल्या घरी वास्तव्यास हाेते. उज्ज्वला या आपल्या शेतात काम करीत हाेत्या तर कुटुंबातील इतर सदस्य घरीच असल्याने ते बचावले. या घटनेबाबत हिंगणा पाेलीस, तहसीलदार, तलाठी यांना माहिती देण्यात आली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शेतकरी महिलेचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शाेककळा पसरली आहे. ही घटना समजताच नागरिकांनी माेठी गर्दी केली होती. पंचायत समिती सदस्य अविनाश पारधी, सातनवरीचे सरपंच विजय चाैधरी, शिरपूर – भुयारीचे माजी सरपंच गाैरीशंकर गजभिये, धामणाच्या सरपंच वंदना थुटूरकर, उपसरपंच मनाेहर येलेकर यांनी घटनास्थळ गाठून मृत महिलेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

*चंद्रपूर जिल्ह्यात दोन घटना…*

भद्रावती नगरपालिका क्षेत्रातील व एकात्मिक बरांज खुल्या कोळसा खाणीलगत असलेल्या चिचोर्डी शेतशिवारात पाळीव जनावरे राखत असलेल्या गुराख्यावर अचानक आलेल्या पावसात वीज कोसळली. यात त्याचा मृत्यू, तर एक जण जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. संजय काशिनाथ चालखुरे (५५, रा. बरांज, मोकासा) असे वीज पडून मृत्यू झालेल्या गुराख्याचे नाव आहे. विकास डाखरे (३०, रा. बरांज, मोकासा) असे जखमीचे नाव आहे.

दरम्यान, जिवती तालुक्यातील शेडवाही (लांबोरी) येथील तरुण शेतकरी अनिल सोयाम या शेतकऱ्याचा शेतात काम करत असताना बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना शेडवाही शिवारात घडली. तेथे असलेल्या त्यांच्या सात शेळ्याही ठार झाल्या. घटनेचा पंचनामा तलाठी निशांत मालेकर यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here