जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी सामाजिक आरोग्यास घातक, नव्या पोलीस अधीक्षकांसमोर मोठे आव्हानं.
चंद्रपूर प्रतिनिधी :–
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर पुन्हा जिल्ह्यात वाढती कोळसा चोरी, रेती चोरी, सुगंधीत तंबाखूची खुलेआम विक्री, गांजा विक्री,ऑनलाईन लॉटरी व सट्टापट्टी इत्यादीमुळे गुंडगिरी वाढली असून पोलीस प्रशासन आपल्या हप्ताखोरी व्यवस्थेमुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याच्या चर्चा आहे. अर्थात नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यापुढे आता नवे आव्हान उभे ठाकले आहे.
चंद्रपूरलगत असलेल्या दुर्गापूर परिसरात चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राच्या मेजर गेट जवळ नायरा पेट्रोल पंपजवळ एका इसमाची धारदार शस्त्राने धडावेगळे शीर करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री 10.45 वाजताच्या सुमारास समोर आली. महेश मेश्राम (32) रा. आयप्पा मंदिर परिसर चंद्रपूर असे मृतकाचे नाव असल्याचे बोलले जात आहे.
या घटनेची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून काहीच अंतरावर दुर्गापूर पोलीस ठाणे आहे. सुमारे ४-५ जणांनी मिळून आरीने शीर कापून हत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती होताच दुर्गापूर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच घटनास्थळावरून मृतदेह हलविला. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी रात्री 12-00 च्या सुमारास घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला