Home चंद्रपूर उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी विकसित करा- आ. किशोर जोरगेवार

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मागणी

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर :- चंद्रपूर हा औद्योगीक जिल्हा आहे. येथे अनेक उद्योग आहे. त्यामुळे या उद्योगांना पुरक असे नवे उद्योग या जिल्ह्यात उभे राहु शकतात ही बाब लक्षात घेत येथील उद्योग वाढीसाठी चंद्रपूर येथील मोरवा विमानतळाची धावपट्टी व्यावसायिक विमाने उतरण्याच्या दृष्टीने विकसीत करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असून या भेटी दरम्यान सदर मागणी केली आहे. या मागणीचे निवेदनही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले आहे. यावेळी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील इतरही प्रश्नांबाबत आमदार किशोर जोरगेवार यांची राहूल नार्वेकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे.
चंद्रपूर हा औद्यागिक जिल्हा असून मोठे वीज निर्मिती प्रकल्प, कोळसा खाणी, लोहखनिज, सिमेंट उद्योग, कागदउद्योग, आयुध निर्माण प्रकल्प, वनसंपत्ती, पर्यटन असे अनेक उद्योग चंद्रपूर येथे आहे. यामुळे या क्षेत्रात अजून नवीन उद्योग आणि कारखाने उभारण्याची क्षमता आहे. या सर्व उद्योगांचे संचालन आणि नियमन मुंबई, नागपूर, दिल्ली, बंगलोर, अहमदाबाद, रायपुर या सारख्या शहरांमधून होत असते. चंद्रपूर व गडचिरोली सारख्या सुदूर व मागास क्षेत्राला जोडण्याकरिता शासनाच्या वतीने १९६७ ला मोरवा या ठिकाणी २२ हेक्टर जागेत विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने विमान धावपट्टी विकसित करण्यात आली. सदर विमानतळाची धावपट्टीची लांबी 900 मीटर व रुंदी 28 मीटर इतकी आहे. त्यामुळे सदर विमानतळ केवळ छोटेखानी विमान उतरण्यासाठी योग्य आहे. तसेच सद्यस्थितीत सदर विमानतळाचा वापर केवळ व्हीआयपीच्या हालचालींसाठी केला जातो.
मात्र आता सदर विमान धावपट्टी व्यावसायिक विमान चलन च्या दृष्टीने विकसित केल्यास या विमानतळाचा वापर अधिक योग्य रीतीने केल्या जाऊ शकतो. तसेच नक्षलप्रभावित चंद्रपूर-गडचिरोली जिल्हायाकरिता सद्यस्थितीत केवळ हे एकच विमानतळ आहे. मोरवा येथील धावपट्टी चा विकास आराखडा नुसार व्यवसायिक विमान चालवण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या व नक्षलप्रभावित चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याला व्यवसायिकदृष्ट्या विमानसेवेने जोडण्यासाठी व येथे नवीन रोजगार निर्मितीसाठी मोरवा, चंद्रपूर विमानतळाची धावपट्टीचा विकास करण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

Previous articleचिंताजनक :- कोट्यावधीच्या गौण खनिज उत्खनन प्रकरणी प्रशासनाची कारवाई गुलदस्त्यात ?
Next article६ नोव्हेंबरपासून एसटीची वाहतूक ठप्प होणार? गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा दिली संपाची हाक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here