शिवानी वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर? कुणाचे पारडे जड? एक विश्लेषण.
चंद्रपूर :-
खरं तर कुणाच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी राजकारणात कुणाला संधी मिळत नाही, तर ज्या व्यक्ती जवळ साम, दाम, दंड, भेद या चाणक्य नितीचा प्रयोग करण्याची धमक आणि जनतेतआपल्या विषयी ओढ निर्माण करण्याची कला असतें त्या उमेदवरांना त्यांच्या निवडून येण्याच्या क्षमतेमुळे पक्षाची उमेदवारी मिळत असतें, याचे ताजे उदाहरणं दिले गेल्यास सुधीर मुनगंटीवर यांचे द्यावे लागतील, मागील चार वेळा खासदार राहिलेले हंसराज अहिर यांना भाजप ने तिकीट दिले नाही तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट दिले आहे, कारण स्पष्ट आहे ते म्हणजे सुधीर मुनगंटीवर यांच्यात निवडून येण्याची क्षमता आहे, ते प्रतिस्पर्धी उमेदवरांच्या समोर आव्हान उभे करू शकतात, त्याच धर्तीवर कांग्रेस उमेदवारीचे गणित अवलंबून आहे, कांग्रेस कडून आमदार प्रतिभा धानोरकर ह्या मलाच उमेदवारी मिळावी म्हणून आग्रही आहे आणि त्यांना पक्षाने उमेदवारी द्यावी हा सर्वसामान्य नियम आहे, व पक्षाच्या एजंड्यावर सुद्धा आहे, कारण त्यांचे पती खासदार बाळू धानोरकर होते आणि त्याअर्थाने त्या लोकसभेच्या प्रमुख दावेदार आहे, पण केवळ प्रतिभा धानोरकर यांच्या महत्वाकांक्षेपोटी त्यांना कांग्रेस कमेटीने उमेदवारी द्यावी असा त्याचा अर्थ होतं नाही तर ही जागा मेरिट नुसार योग्य तो निर्णय घेऊन देण्यात यावी असा राजकीय कल आहे.
चंद्रपूर मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील 2 आणि चंद्रपूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. काँग्रेस खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्यात नव्याने राजकीय समीकरणांची मांडणी होतं आहे. दरम्यान या मतदारसंघात सर्वाधिक संख्येत कुणबी समाज असून देखील कुणबी समाजाचा चंद्रपूर लोकसभेचं एकदाही खासदार पद न मिळाल्याचा मुद्दा गेल्या निवडणुकीत केंद्रस्थानी आला होता. त्यामुळे टोकदार झालेली जातीय अस्मिता, गाठीशी असलेली काँग्रेसची परंपरागत मतं, दलित आणि मुस्लिमांची हक्काची व्होट बँक आणि भाजप मधून झालेली छुपी मदत यामुळे बाळू धानोरकर मोदी लाटेतही निवडून आले. राज्यातील 48 मतदारसंघांपैकी बाळू धानोरकर काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले. राज्यात अनेक ठिकाणी बहुजन वंचित आघाडीने काँग्रेसचं नुकसान केलं असलं तरी चंद्रपूर मतदारसंघात वंचितचे उमेदवार राजेंद्र महाडोळे यांच्यामुळे माळी समाजाच्या मतांचं मोठ्या प्रमाणात विभाजन झालं आणि भाजपची हक्काची मतं आणि लोकसभेची जागा गेली हे सत्य कुणी नाकारू शकत नाही
चंद्रपूर लोकसभेत समाविष्ट असलेल्या विधानसभेच्या 6 मतदारसंघांपैकी बल्लारपूर, वणी आणि आर्णी भाजपच्या ताब्यात आहे तर राजुरा आणि वरोरा मतदारसंघ काँग्रेसच्या आणि चंद्रपूर विधानसभा अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या ताब्यात आहे. आगामी निवडणुकीसाठी लोकसभा उमेदवार म्हणून भाजपकडून जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी मिळाली आहे, तर कांग्रेस कडून प्रतिभा धानोरकर आणि शिवानी वडेट्टीवार यांच्या चूरस सुरु आहे, येणाऱ्या दोन दिवसात या जागेवर कांग्रेस चा उमेदवार कोण? हे ठरणार जरी असलं तरी भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवर यांचं तगडं आव्हान पेलण्यास कोण समर्थ आहे याचा विचार कांग्रेस ने करावा, कारण निव्वळ भावनेच्या भरात आणि सहानुभूती यावर राजकारण चालत नाही तर त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि निवडून येण्याची सूक्ष योजना आखावी लागते ती कुणाकडे आहे यावर विचारमंथन करण्याची गरज आहे.
शिवानी वडेट्टीवार की प्रतिभा धानोरकर? कोण पुढे?
मागील 2019 च्या निवडणुकीत जे राजकीय समीकरण बनले आणि कांग्रेस चे बाळू धानोरकर निवडून आले, त्याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे, कारण तेंव्हा जी परिस्थिती होती ती वेगळी होती, त्यात हंसराज अहिर यांच्या विरोधात जनमत होतं आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी गुप्तपणे छुपा पाठिंबा देत धानोरकर यांच्यामागे ताकत उभी केली होती, शिवाय आमदार विजय वडेट्टीवार यांचं नियोजन आणि सगळ्या आयुधांचा वापर करून व सामाजिक इंजिनिअरिंगचा फार्मुला जुळवून चंद्रपूर जिल्ह्यातील चारही विधानासभा क्षेत्रात त्यांनी कांग्रेसला बढत मिळवून दिली होती, परंतु त्यावेळी संघटितपणे लढणाऱ्या कांग्रेसमध्ये आज दुफळी आहे आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्षातील नेत्यावर आरोप लावून माझ्या पतीला त्यांनीच मारले असा जो गौप्यस्फ़ोट केला तो कांग्रेसमध्ये अंतर्गत शीतयुद्ध असल्याचा संकेत आहे, त्यांचा रोख हा विजय वडेट्टीवार यांच्यावर आहे, त्यामुळे बलाढ्य असणाऱ्या भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवर यांच्या समोर ताकतीने उभा राहणारा व शेवटच्या क्षणापर्यंत टिकणारा उमेदवार कांग्रेस ला यावेळी द्यावा लागेल आणि त्यात विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांचेच नाव समोर येत आहे, भाजप च्या निवडणूकीच्या राननीतीला भेदण्याचे सामर्थ्य विजय वडेट्टीवार यांच्यातच आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात रननीती आखली आहे त्यावरून शिवानी वडेट्टीवार यांचे पारडे जड आहे, अर्थात लोकसभा निवडणुकीत कांग्रेस ला बाजी मारायची असेल तर 2019 चे कांग्रेस रणनीतीकार विजय वडेट्टीवार यांच्याकडे हे काम देणे व शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी देणे आवश्यक आहे.