Home गडचिरोली गंभीर :- राजघराने सत्तेच्या मदमस्तीत व्यस्त, जनता मात्र त्रस्त

गंभीर :- राजघराने सत्तेच्या मदमस्तीत व्यस्त, जनता मात्र त्रस्त

आलापल्ली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ताच्या मेळाव्यात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मंत्री आत्राम यांच्यावर गंभीर आरोप.

अहेरी प्रतिनिधी :-

गेल्या चाळीस वर्षापासून अहेरीतील राजघराणे सत्ता भोगत आहे. विकासाच्या बाबतीत माञ प्रचंड असंवेदनशीलता बाळगत आहे. क्षेत्रातील जनतेला मूलभूत सुविधांसाठी जीवाचे रान करावे लागत असून प्रचंड यातनामय जीवन जगावे लागत आहे. स्वार्थापोटी राजघराणे सत्तेच्या मस्तीत व्यस्त असताना क्षेत्रांतील जनता माञ वेदनांनी त्रस्त असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. मंत्री धर्मराव आत्राम यांच्या मतदारसंघात आलापल्ली येथे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या खोटारड्या विकासाचे पितळ उघडे पाडले. आयोजित मेळाव्यास गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, गडचिरोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार पेंटारामा तलांडी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, काँग्रेस आदिवासीं सेल जिल्हाध्यक्ष हनुमंत मडावी, भानय्या जंगम, महीला आघाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, सगुणा तलांडी, सोनाली कंकडालवार, सुरेखा आत्राम, सुरेखा गोडशेलवार, डॉ. निसार हकीम, प्रमोद गोटेवार, बाळू बोगामी, भास्कर तलांडे, मुश्ताक हकीम, सतिश जवाजी, गंपावर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचा आपल्या शैलीतून खरपूस समाचार घेतला.एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढवून बहिणीची लूट करून सुरू आहे दुसरीकडे कोट्यावधींची जमीन अदानीला विकता, राज्यातील उद्योग गुजरातला पळविण्यात हातभार लावता, अशा निर्दय आणि निष्ठूर सरकारला आगामी निवडणुकांमध्ये जनताच धडा शिकवेल, हे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अन्न औषध प्रशासन मंत्राच्या क्षेत्रात लाखो रुपयांचा सुगंधी तंबाखू, गुटखा सापडतो आणि कारवाई होत नाही. राज्यात कायदा असा राबवला जातो का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. केवळ घरात सत्ता राहावी म्हणून मंत्री आत्राम व त्यांच्या मुली मध्ये राजकीय द्वंद हे सुनियोजित आहे, अशी टीका केली. अहेरी मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून राजघराण्यापेक्षा सामान्य कुटुंबातील व्यक्तीला निवडून द्या असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

लोकसभेत दाखवलेली जागरूकता आणि संविधान वाचविण्यासाठी दिलेला लढा हीच काँग्रेस पक्षाची ताकद असून आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून राज्यातील महायुतीच्या भ्रष्ट सरकारला हद्दपार करावे असे आवाहन गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केले. तत्पूर्वी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आपल्या प्रास्ताविकातून क्षेत्रातली जनतेच्या समस्या मांडल्या. तर काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे व कविता मोहरकर यांनी जिल्ह्यांतील कार्यकर्ता व पदाधिकारी यांना काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण तळागळ पर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाकरिता गडचिरोली अहेरी विधानसभा क्षेत्रातील कानाकोपऱ्यातील काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here