उपविभागीय अधिकारी शिंदे व उपविभागीय पोलिस अधिकारी पांडे यांच्या संयुक्त कारवाईत शासनाला मिळाला एक कोटी पेक्षा जास्त महसूल,
वरोरा प्रतिनिधी :-
चंद्रपूर येथील ईरई नदीतून रेती तस्करी करणाऱ्या रेती तस्कराना पकडण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार राजू धांडे यांच्यावर शाबीर सीद्दीकी व जहांगीर सीद्दीकी या रेती तस्करांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने एकीकडे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असताना वरोरा भद्रावती या क्षेत्रातील उपविभागीय अधिकारी शिंदे व उपविभागीय पोलिस अधिकारी पांडे यांनी आपली चोख भूमिका बजावून लॉक डाऊन च्या काळात तब्बल एक कोटी पेक्षा जास्त रेती चोरीचा साठा रेती चोरट्यांकडून जप्त करून शासनाला मोठा फायदा पोहचुन दिला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावरून जर अधिकारी प्रामाणिक असेल तर कुठल्याही महसूल चोरीचा पर्दाफाश होऊ शकतो हे उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी दाखवून दिले आहे. मात्र चंद्रपूर तालुक्याची शोकांतिकाच म्हणावी लागेल की रेती माफिया कडून पैसे घेवून एक नायब तहसीलदार भास्करवार हे परत येतांना अपघातात मरण पावतात तर दुसरे नायब तहसीलदार राजू धांडे यांच्यावर प्राणघातक हमला होतो पण तरीही अजून पर्यंत वडा रेती घाटावर खुलेआम रेती चोरी करतानाचे व्हिडिओ व्ह्ययरल झाले असताना सुद्धा जिल्हाधिकारी यांच्याकडून संबंधित रेती तस्करावर कारवाई का केल्या जात नाही ? हा प्रश्न अतिशय गंभीर असून खरं तर उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्यापासून प्रेरणा घेऊन जर इतर महसूल अधिकारी यांनी आपली प्रामाणिक भूमिका बजावली तर शासनाच्या संपत्तीची चोरी करून शासनाचा महसूल बुडविण्याची कुणाची हिंमत होणार नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आता रेती माफिया विरोधात उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या सारख्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना रेती माफियावर कारवाई करण्यासाठी जबाबदारी सोपवावी अशीही चर्चा होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात रेती चोरट्यांनी मोठे थैमान घातले असताना व सगळीकडे राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करांचे साम्राज्य जिल्ह्यात फोफावले असतांना वरोरा भद्रावती या क्षेत्रात मात्र राजकीय दबावाला बळी न पडता उपविभागीय अधिकारी शिंदे यांनी रेती माफियांवर केलेली कारवाई ही खरोखरंच महाराष्ट्राच्या लॉकडाऊन काळातील सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. कारण लॉक डाऊन च्या काळात शासनाला एक कोटी पेक्षा जास्त महसूल मिळवून देणारी बहुदा महाराष्ट्रातील ही पहिली घटना आहे, त्यामुळे आता चंद्रपूर येथील ईरई नदी घाटावर झालेल्या नायब तहसीलदार राजू धांडे यांच्यावरील हल्ला प्रकरणातून जिल्हाधिकारी हे चंद्रपूर तालुक्यातील वडा रेती घाटासह इतर ठिकाणी रेती तस्करी करणाऱ्यांवर काय कारवाई करतात हे पाहणे लक्षवेधक ठरणार आहे.