कोळसा वाहतूक दहा दिवस राहणार बंद, उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत वेकोलि व जीएमआर व वर्धा पॉवर कंपनी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यास राजी.
वरोरा प्रतिनिधी :-
तालुक्यातील नव्यानेच वेकोलिने एकौणा कोळसा खदान सुरू केली असून मोठ्या प्रमाणात कोळसा उत्खनन झाल्यानंतर तो कोळसा तालुक्यातील जीएमआर व वर्धा पॉवर वीज निर्मिती केंद्रात पाठविला जात आहे मात्र मागील एक वर्षापासून कोळसा वाहतूक ही रात्रीच्या वेळेस शहरातील शिवाजी वार्ड कासम पंजा वार्ड, अभ्यंकर आणि दत्त मंदिर वार्ड मधून सुरू असल्याने शहरातील या वार्डातील नागरिकांना ओवरलोड कोळसा वाहतूकीच्या प्रदूषणाने मोठा त्रास सहन करावा लागत होता. या संदर्भात शहरातील वरील वार्डातिल नागरिकांनी प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली व काही दिवसापूर्वी रात्रीच्या वेळेस कोळसा वाहतुकीचे ट्रक सुद्धा अडवले पण त्यानंतर सुद्धा तोडगा निघाला नसल्याने काल दिनांक १४ सप्टेंबर ला मनसेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांच्या नेत्रुत्वात शिवाजी बार्डातिल नागरिकांनी रात्रीच्या ११ वाजेपासून शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन करून दोन्ही बाजूने येणारी वाहतूक ठप्प केली हे आंदोलन आज दुपारी अडीच वाजेपर्यंत सुरू होते, त्यामुळे वेकोलि प्रशासन व वीज निर्मिती कंपनी प्रशासन खडबडून जागे झाले आणि दुपारी मनसेचे नेते रमेश राजूरकर, नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांच्या पुढाकाराने उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पांडे, तहसीलदार सचिन गोसावी, जीएमआर कंपनी व वेकोलिचे अधिकारी, माजी नगरसेवक खेमराज कूरेकार, मनसे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, शरद मडावी व शिवाजी वार्डातिल नागरिक उपस्थित होते. या बैठकीत सर्वानुमते तात्पुरती कोळसा वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय होऊन येत्या दहा दिवसात पर्यायी व्यवस्था करू अशी ग्वाही वेकोलि प्रशासन व जीएमआर वर्धा पॉवर कंपनी व्यवस्थापन यांनी दिल्याने वार्डातिल नागरिकांच्या रात्रभर चाललेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकरणात मनसेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांनी वार्डातिल नागरिकांना घेवून अगोदरच ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता हे विशेष.