प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भद्रावती यांनी कोरोना काळात लावला निकाल.
उमेश कांबड़े ता.प्र भद्रावती :-
भद्रावती तालुक्यातील आष्टी (का) येथे घरातील कडी काढून जोर जबरदस्तिने महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला सहा वर्षानंतर न्यायालयाने शिक्षा सुनावली असून त्याला एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड ठोठावला आहे, दंड न भरल्यास १५ दिवसाचा साधा कारावास अशी शिक्षा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी भद्रावती यांनी सुनावली. विवेकानंद उर्फ अभिजित अर्जुन काकडे वय २३ रा.आष्टी (काकडे) असे आरोपीचे नाव असून याने दिनांक १३ फेब्रुवारी २०१५ ला आपल्या राहते गावी आष्टी येथील एका महिलेच्या घराची कडी तोडून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता, या घटनेची तक्रार पीडित महिलेने भद्रावती पोलिसात दाखल केली त्यामुळे आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला व आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भद्रावती यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. तब्बल सहा वर्षांनी न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी या प्रकरणाचा निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे मनोज व्ही खंडाळकर यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी पो.हवा नीलिम नलोडे यांनी बघीतले. विशेष म्हणजे न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी २०२१ मध्ये तब्बल नऊ गुन्ह्यातील निकाल दिला आहे. त्यामुळे या न्यायालयात जलदगतीने निर्णय लागत असल्याने आरोपींचे धाबे दणाणले आहे.