जयसुख, मनसुख, नुतन, हरिश, गुप्ता व जितूवर का नाही कारवाई?
लक्षवेधी :-
चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधित तंबाखू व्यापारी यांचे पोलीस प्रशासन व अन्न औषधी विभागाचे अधिकारी यांच्यासोबत असलेले अर्थपूर्ण मधुर सबंध यामुळे दररोज लाखो रुपयाचा सुगंधित तंबाखू राजरोसपणे जिल्ह्यात येत असून जिल्ह्यातील जवळपास १५०० ते २००० पानठेल्यावर खर्रा खुलेआम मिळत आहे. मात्र अचानक मंगळवार दिनांक १२ ऑक्टोंबर रोजी सुगंधित तंबाखू ची विक्री करणाऱ्या वसीम अख्तर झिंगरी (३५) याला स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या एमआयडीसी परिसरातील गोडाऊनमधुन संपूर्ण महाराष्ट्रात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखुचा पुरवठा करणाऱ्या वाहनासह३ लाखांपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान आता जिल्ह्यातील सर्व सुगंधित तंबाखू विक्रेत्यांना अटक होईल आणि पानठेल्यावर मिळणारा खर्रा गायब होईल अशी अपेक्षा असताना जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू विक्रेते जयसुख, मनसुख, नुतन, हरिश, गुप्ता व जितू यांचा अवैध सुगंधित तंबाखू चा धंदा मात्र सुरूच आहे तर मग एकट्या वसीम वर कारवाई का करण्यात आली? याचे उत्तर ना पोलीस प्रशासन द्यायला तयार आहे ना अन्न औषधी विभाग.
जिल्ह्यातील सर्वात मोठा अवैध सुगंधित तंबाखू विक्रेता जयसुख हा वसीम चा पार्टनर राहिला आहे कारण दोघांच्या आपसी लढाईत पोलीस प्रशासन याचा फायदा घेईल अशी त्यांची समज होती मात्र आता ते दोघेही वेगवेगळा धंदा करताहेत व त्यांचे सबडिलर्स सुद्धा वेगवेगळा आहे यात प्रत्त्येक तालुक्यात यांनी आपले सबडिलर्स वाटले आहे.दरम्यान वसीम यांच्यावर पोलीसानी केलेली कारवाई व त्याचेविरोधात भादवी ३२८, २७३, १८८ अंतर्गत दाखल केलेले गुन्हे शिवाय अन्न औषधी प्रशासन विभागाने सुद्धा अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अन्वये २६, २६ (२),(१), २६, (२), (४), २७ (२)(सी), ३०(२)(अ) अंतर्गत वसीम यांच्यावर कारवाई केली.पण मग बाकीचे सुगंधित तंबाखू व्यापारी यांना खुली सूट दिली आहे का? विशेष म्हणजे यामागे राजकीय छडयंत्र आहे का? असे प्रश्न निर्माण होत आहे.
अन्न प्रशासन विभाग साखर झोपेत का?
खरं तर बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू अवैधरित्या जिल्ह्यात आणणाऱ्या व्यापारी यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासन विभागाची असताना त्या विभागातील अधिकारी मात्र जणू साखर झोपेत असल्याची चिन्हे दिसत आहे. कारण सुगंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्या व विकणाऱ्या व्यापारी यांच्यावर पोलीस विभागानेच अनेक कारवाया केल्या आणि मग अन्न औषधी प्रशासन विभागाने पोलीस स्टेशन मधे तक्रारी दिल्या. याचा अर्थ या विभागाला हप्ता वेळेवर पोहचतो आणि त्यामुळे ते आंधळ्या बहीर्याचे सोंग घेऊन असतात.
वसीम वर कारवाई राजकिय छडयंत्र?
जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर आता राजकीय वरदहस्त असणाऱ्या अवैध व्यावसायिकांनी आपला मोर्चा अवैध सुगंधित तंबाखू च्या धंद्याकडे वळवला असल्याने जोपर्यंत प्रस्थापित धंदेवाईक यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत नवीन धंदेवाईक यांना धंदा मिळणार नाही अर्थात सुगंधित तंबाखूच्या धंद्यात असलेला वारेमाप नफा यामुळे या धंद्यात राजकीय नेत्यांचा शिरकाव सुरू झाल्याने सर्वात मोठा व्यवसायी म्हणून वसीम याच्यावर कारवाईचे छडयंत्र रचल्या गेले असल्याची चर्चा आहे.