चंद्रपूर जिल्ह्यात किती होणार सदस्यांची वाढ? काय आहे स्थिती ते वाचा.
चंद्रपूर प्रतिनिधी :-
राज्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांच्या रचना प्रक्रियेचा मार्ग महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील सुधारणेमुळे मोकळा झाला असून चंद्रपूर जिल्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या कलम ९ मध्ये पोटकलम (१) मधील खंड (अ) मध्ये सुधारणा करत किमान पन्नास आणि अधिक पंच्याहत्तर ऐवजी किमान पंच्चावन्न व अधिक पंच्याऐंशी सदस्य संख्या करण्यात आली आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कच्च्या आराखड्यासाठी पाच फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.
राज्यातील पालघर, ठाणे, धुळे, नंदूरबार, अकोला, वाशीम, भंडारा आणि गोंदिया वगळता इतर २५ जिल्हा परिषदा आणि त्यातंर्गतच्या २८४ पंचायत समित्यांची मुदत पुढील महिन्यात संपत आहे. प्रत्यक्षात मात्र ओबीसी आरक्षणापासून इतर तांत्रिक बाबींमुळे आगामी निवडणुकांचे काय होणार? याबद्दलची उत्सुकता राज्यात आहे. राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांसाठी ३० नोव्हेंबर २०११ पर्यंत प्रारूप प्रभाग रचना करण्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले होते. तथापि, मुख्य सचिवांनी २९ नोव्हेंबर २०२१ च्या पत्रानुसार २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्यासाठी अधिसूचनेत सुधारणा करण्याची विनंती केली होती. त्यानुसार विधीमंडळाने २२ डिसेंबर २०२१ ला सुधारणा विधेयक मंजूर केले. विधेयकाचे राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर ३१ जानेवारी २०२२ ला कायद्यात रुपांतरण झाले आहे. त्याप्रमाणे बुधवारी (ता. २) राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कच्चा आराखडा ई-मेलद्वारे सादर करण्यास सांगितले आहे.
सोडतीचा कार्यक्रम यथावकाश
प्रभाग रचना करताना त्याची गोपनीयता न राखणे, नियमांचे काटेकोर पालन न होणे, प्रारूप प्रभाग रचनेविरुद्ध वाढणाऱ्या हरकतींची संख्या, अंतिम प्रभाग रचनेविरुद्ध दाखल होणाऱ्या याचिकांची संख्या अशा बाबी राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे आयोगाने विलंब टाळण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्यक्ष प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम नंतर जाहीर केला जाईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात काय होणार परिवर्तन?
चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 56 जिल्हापरिषद सदस्य संख्या आहे मात्र त्यात घूग्गूस नगरपरिषद झाल्याने त्यात संख्या कमी होईल, दरम्यान मतदारांमधे झालेली वाढ बघता पुनः सदस्यसंख्येत वाढ होऊन ती 62 च्या घरात जाण्याची शक्यता आहे.