Home चंद्रपूर खळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम...

खळबळजनक :- भाजप शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या खाजगी रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध,

भारतीय पुरातत्व विभागाचा डॉ. मंगेश गुलवाडे यांना नोटीस, मग मनपाकडून बांधकामाला परवानगी दिली कशी ?

मनपाचा भ्रष्ट कारभार भाग – १६

चंद्रपूर मनपाचा भ्रष्ट कारभार आता शहरातील जनतेच्या जिव्हारी लागण्याची वेळ आली असून सत्ताधाऱ्यांना वाट्टेल ते सूट देवून सर्वसामान्यांना वेठीस धरल्याने शहरवाशीयांमधे संतापाची लाट निर्माण झाली आहे. एकीकडे गोरगरीबांच्या झोपड्या तोडायला यांना न्यायालयाच्या आदेशाची सुद्धा आवश्यकता लागत नाही तर श्रीमंत आणि सत्ताधारी यांचे अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश असताना सुद्धा मनपा प्रशासन ते बांधकाम तोडत नाही तर मग चंद्रपूर महानगर पालिकेत कायद्याचे राज्य आहे का ? असा प्रश्न आता पडायला लागला आहे ? एरव्ही सुसंस्कृत पक्ष म्हणून मिरविनाऱ्या भाजप पक्षाची सत्ता चंद्रपूर महानगर पालिकेत असताना त्याच भाजप पक्षातील महापौरांच्या नातेवाईकांचे अवैध बांधकाम आणि मोक्याच्या जागेवर अतिक्रमण असेल, एवढेच काय भाजपच्या शहर अध्यक्षांच्या रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध असेल तर मग भाजप ला शहरातील मोक्याच्या जागेवर अतिक्रमण व अवैध बांधकाम करण्यासाठी सत्ता देवून खुली सूट शहरातील जनतेने दिली का ? हा गंभीर प्रश्न आहे.

महापौर राखी कंचर्लावार यांचे पती नगरसेवक संजय कंचर्लावार, दीर राजेंद्र कंचर्लावार, दत्तू कंचर्लावार यांचे शहरातील मोक्याच्या जागेवरील अतिक्रमण व अवैध बांधकाम हे चव्हाट्यावर आल्यानंतर आता चक्क भाजप शहराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांचे रूग्णालयाचे बांधकाम सुद्धा अवैध असल्याचे शिक्कामोर्तब भारतीय पुरातत्व विभागाने नोटीस देऊन केल्याने एकच खळबळ उडाली असून जर एवढे मोठे रूग्णालयाचे बांधकाम पुरातत्व विभागाने बेकायदेशीर व भारतीय पुरातत्व संरक्षित कायद्याचा भंग करणारे आहे असे म्हटले आहे मग चंद्रपूर महानगर पालिकेच्या बांधकाम व नगररचना विभागाने डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या रुग्णालयाच्या बांधकामाला परवानगी दिली कशी? हा यक्ष प्रश्न उभा राहतो, खरं तर भाजप ची चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता आता शहरातील जनतेसाठी नवी ताणाशाही निर्माण करणारी ठरू पाहत आहे असेच म्हणावे लागेल कारण सर्वसामान्यांना कायद्याचा धाक दाखवायचा आणि सत्ताधारी यांना खुली सूट देवून वाट्टेल तिथे अतिक्रमण व अवैध बांधकाम याची मुभा द्यायची त्यासाठी मनपा प्रशासन जणू आंधळे, बहीरे आणि मुके करून टाकायचे ही कसली अराजकता? आता ह्या सर्व चक्रव्यूहातून शहरातील जनतेला बाहेर निघायचे असेल तर जनआंदोलन करण्याची गरज आहे कारण ज्या नगरसेवकांना शहरातील जनतेने निवडून दिले ते नेमके मनपा सभागृहात काय करताहेत ? हेच कळत नाही त्यामुळे आता येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा त्याची कामे महानगर पालिकेत चुटकीसरशी व्हावी यासाठी लढवय्या कार्यकर्त्यांना पुढे करण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here