औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करा हा शिवसेनेचा जुनाच कार्यक्रम मनसेने केला हायजॅक?
मुंबई :-
महाराष्ट्र राज्यातील ठाकरे सरकार तीन पक्षाचे आहे त्यामुळे आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमांवर चालत आहे. कुणाच्या वैयक्तिक कार्यक्रमावर नाही. अर्थात किमान समान कार्यक्रम ठरवून त्यांवर काम करण्यासाठी आघाडी तयार केली आहे, नाव बदलण्यासाठी नाही, असे ट्विट करत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेच्या सामना तील अग्रलेखातील हवा काढली त्यामुळे दिवसेंदिवस हा औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या अधिकच गरम होत असल्याचे दिसत आहे.
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर केले जावे अशी मागणी मनसेने लावून धरली आहे. तर, औरंगाबादच नामांतर संभाजीनगर करणार असल्याची घोषणा शिवसेनेने वारंवार केली आहे. एवढेच नाही तर बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होत त्यामुळे ते पूर्ण करणारचं असे शिवसेनेने म्हटले आहे. यावरून आता काँग्रेस व शिवसेना यांच्यात धुसफुस सुरू झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते या मुद्यावरून शिवसेनेवर निशाणा साधताना दिसत आहेत तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक होऊन सरकारने जर २६ जानेवारी पर्यंत नामांतर केले नाही तर मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला आहे, एवढंच नव्हे तर या विषयाला घेवून नाशिक मधे मनसेचे खळखट्याक आंदोलन सुरू झाले त्यामुळे आता आघाडीचा धर्म निभवायचा की स्वर्गीय बाळासाहेबांना अभिप्रेत संभाजीनगर नामकरण करायचे ?या प्रश्नाच्या चक्रव्यूहात शिवसेना सापडली असल्याने मनसेने ह्या मुद्द्याला प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला आहे.
काँग्रेस ची संजय निरुपम म्हणाले की, औरंगजेबचे व्यक्तिमत्व वादग्रस्त राहिले आहे. त्याच्या प्रत्येक कृतीशी काँग्रेस सहमत असणे गरजेचे नाही. संभाजीराजे महान योद्धे होते, त्यांचा त्याग महान आहे. याबाबत काहीच मतभेद नाही. मात्र सरकार चालवत असताना शिवसेना महापुरुषांना मध्ये आणेल तर नक्कीच नुकसान होईल, त्यामुळे या प्रकरणात स्वतः निर्णय घ्यावा, असा इशाराच त्यांनी सेनेला दिला आहे.
औरंगाबादच्या नामांतरला काँग्रेसचा विरोध
तर या अगोदर औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आल्यानंतर त्याला कॉंग्रेसचा विरोध असेल. किमान समान कार्यक्रमामध्ये नामांतरासारख्या बाबीचा समावेश नाही. अशा नामांतरामुळे सामान्यांचा विकास होतो असे आम्ही मानत नाही. केवळ नामांतरच नाही तर घटनेतील प्रास्ताविकेमध्ये दिलेल्या मूल्यांची प्रतारणा होईल अशा कोणत्याही कृतीस कॉंग्रेसचा विरोध असेल.” असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती रंगली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिक आक्रमक झाली असल्याने शिवसेनेला हा मुद्दा घातक ठरत आहे.