पती पत्नीच्या कौटुंबिक वादाच्या बहाण्याने ठाणेदारांची नियत बिघडली?
पोलीस पंचनामा :-
ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था राखण्याचे व गोरगरीब पीडितांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याची जबाबदारी आहे तेच जर स्वतः कायदा सुव्यवस्था बिघडवुन महिलांवर अत्याचार करण्याचे धाडस करीत असेल तर मग न्याय मागाचा तो कुणाकडे? हा गंभीर प्रश्न असून गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी पोलीस स्टेशन च्या ठाणेदारांनी चक्क त्यांच्या पोलीस कर्मचारी यांच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय… असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले असते. अर्थात सज्जनांचे रक्षण आणि दूर्जनाचा नायनाट करणे पण इथे तर ठाणेदार साक्षात दुर्जन बनून अबला महिलेची अब्रू लुटण्याच्या प्रयत्न करीत आहे आणि महत्वाची बाब म्हणजे ठाणेदार आपल्या पोलीस कर्मचाऱ्याने वरिष्ठांना तक्रार देऊ नये म्हणून आपल्या पदाचा दुरुपयोग करतो व तरीही वरिष्ठांकडे तक्रार झाल्यानंतर सुद्धा त्या ठाणेदारांवर गुन्हा दाखल होत नाही म्हणजे जिथे पोलीस कर्मचारी यांच्या पत्नीच्या तक्रारीची दखल वरिष्ठ घेत नसतील तर मग सर्वसामान्य जनतेचे काय हाल असेल असा प्रश्न पडत आहे.
पती-पत्नीमधील कौटुंबिक भांडण सोडविण्यासाठी आपल्या हक्काच्या ठाणेदाराला वडीलधारे म्हणून पिडीत महिलेच्या पती जो पोलिस शिपाई आहे त्यांनी आपल्या घरी बोलावले असता ठाणेदाराने कौटूंबिक भांडण सोडविण्याऐवजी त्यांची नियत बिघडल्याने शिपायाच्या अनुपस्थितीत त्याच्या पत्नीचा हात धरून शरीर सुखाची मागणी केली असल्याची तक्रार आष्टी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलिस शिपाई व त्याच्या पत्नीने गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांचेकडे केली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात सदर तक्रार नोंदविण्यासाठी पिडीता व तिच्या पतीचे आवश्यक बयान नोंदवून घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाची बाब म्हणजे स्वतः पिडीतेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बयान दिल्यानंतर कार्यालयासमोरच प्रसिद्धी माध्यमांसमोर आपबीती सांगितली. ती म्हणाली की ठाणेदार जेव्हा दुपारी घरी आले तेव्हा पतीला घराबाहेर ठेऊन तिचे एकटीसोबत बोलून तिला समजावितों असे सांगितले, आणि घरात आल्यानंतर काही वेळ चर्चा केली. थोड्याच वेळात माझ्या हातावर आपला हात ठेवत त्यांनी शरीरसुखाची मागणी केली. मी नकार दिल्याने नंतर फोनवर बोलतो म्हणून बाहेर ऊभे असलेल्या माझ्या पतीला पोलीस स्टेशन येथे नेले. पती घरी आल्यानंतर मी त्यांना घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर आम्ही तक्रार करण्यासाठी आष्टी पोलीस स्टेशन मध्ये गेलो, परंतु आमची तक्रार नोंदवून न घेता आम्हालाच धमकावले. त्यानंतर आम्ही घरी आलो व गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला व तयारी केली. हे ठाणेदाराला कळताच काही पोलीस पाठवून आम्हाला जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही निर्णयावर ठाम राहून गडचिरोली कडे रवाना झालो. यावेळी ठाणेदाराने रस्त्यात आमची गाडी थांबवून माझ्या पतीला जबरदस्ती गाडीतून ऊतरवून घेऊन गेले. पण मी माझे बाबा व सोबत काही लोक मिळून रात्री गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात आलो व आमची तक्रार नोंदविली, सकाळी माझ्या पतीला पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांचेही बयान घेण्यात आले. आम्ही ठाणेदारावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी अशी मागणी केली आहे.
खरं तर बरेच दिवस लोटल्या नंतर सुद्धा या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र अशा घटनांमुळे पोलीस प्रशासनाची मोठी बदनामी होत आहे विशेष म्हणजे यापूर्वी एका जवानाने मजूर महिलेचा विनयभंग केला होता, मात्र त्या प्रकरणी वर्ष ऊलटूनही न्यायालयात दोषरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकरणात सुद्धा गुन्हा दाखल झाल्यानंतरही योग्य तपास होऊन पिडीत आदीवासी विवाहितेला न्याय मिळेल काय? याबाबत शंका निर्माण होत आहे.