Home कोरपणा निवडणूक रनसंग्राम:- कोरपन्यात काँग्रेसला हरविण्यासाठी तीन माजी आमदार एकवटले

निवडणूक रनसंग्राम:- कोरपन्यात काँग्रेसला हरविण्यासाठी तीन माजी आमदार एकवटले

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सभेने काँग्रेसची बाजू मजबूत, काँग्रेसला एकहाती सत्ता मिळण्याची शक्यता.

कोरपना प्रतिनिधी :–

येत्या २१ डिसेंबरला कोरपना नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत सत्तेत असलेल्या काँग्रेसला हटविण्यासाठी चक्क तीन माजी आमदार एकवटल्याने काँग्रेस ची इथे कशी सरशी आहे हे स्पष्ट होत आहे. खरं तर कोरपना तालुक्यात एकाच मंचावर इतक्या पक्षाचे नेते एकत्र आल्याची ही पहिलीच घटना कोरपना नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने तालुकावासियांना बघायला मिळाली आहे. काँग्रेस स्वतंत्ररित्या ही निवडणूक लढत असून काँग्रेसच्या विरुद्ध सर्व पक्ष एकवटले आहे. परिवर्तन पॅनलच्या नावाखाली भाजप, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, युवा स्वाभिमान पक्ष यांनी एकत्र येऊन काँग्रेसचे विजय बावणे यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी जणू  चंग बांधला आहे. परंतु राजकीय विश्लेषणांत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळण्याची नामी संधी आहे.

कोरपन्यात गेल्या ६० वर्षांपासून अबाधित राहिलेली विजय बावणे परिवाराची सत्ता कायम राहतात की, सत्ता परिवर्तन होऊन परिवर्तन पॅनलच्या हातात सत्तेची सूत्रे जातात याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागलेले आहे. त्यादृष्टीने दोन्ही पॅनलचे कार्यकर्ते कामाला लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी विद्यमान पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळु धानोरकर, आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय बावणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून परिवर्तन करण्यासाठी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री हंसराज अहिर, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार वामनराव चटप तळ ठोकून बसले आहे. दरम्यान काँग्रेसने सर्वच जागांवर आपले उमेदवार उभे केले असून ओबीसी आरक्षणामुळे तीन जागा रिक्त राहणार आहे. काँग्रेस व परिवर्तन पॅनलमध्ये थेट राजकीय लढाई पाहायला मिळणार आहे.

अभद्र युतीचे परिवर्तन पॅनल.

काँग्रेसला शह देण्यासाठी कोरपना येथे अभद्र युती करण्यात आली असून राज्यातील महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे दोन्ही पक्ष काँग्रेस विरोधी परिवर्तन पॅनलमध्ये समाविष्ट आहे. भाजप १०, शेतकरी संघटना ४, राष्ट्रवादी २, शिवसेना १ असे जागा वाटप झाले असून परिवर्तन पॅनलमध्ये भाजपला जास्त वाटा मिळाला आहे. त्यातही ओबीसी आरक्षणामुळे शेतकरी संघटनेचे दोन व शिवसेनेच्या एका उमेदवारासाठी मतदान पुढे ढकलण्यात आले आहे.

राष्ट्रवादीचे घड्याळ गायब?

राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन पॅनलमध्ये समाविष्ट असून भाजपने पक्षाच्या चिन्हावर १० उमेदवार उभे केले आहे. मात्र राष्ट्रवादीच्या उमेदवाराने चिन्ह न स्वीकारल्यामुळे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील राष्ट्रवादीच्या कोणत्याच नेत्याचे फोटो बॅनरमध्ये समाविष्ट नसल्याचे दिसते. निवडणुकीतून घड्याळ चिन्ह गायब झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

Previous articleचिंताजनक :- शेतकऱ्यांच्या शेतात काढणीस आलेली तूर वाळू लागल्याने शेतकरी चिंतातुर.
Next articleस्तुत्य उपक्रम :- वरोरा शहरातील स्मशानभूमी व कब्रस्ताना स्वच्छता अभियानास सुरवात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here