अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
चंद्रपूर :- देशात बालमजुरीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे बालमजुरीवर बंदी घालून शासनाने कठोर कायदे केले आहेत. तरीही अनेक ठिकाणी शाळा सोडून बालकामगार राबताना दिसून येतात. परंतु, बालकामगारांकडून काम करून घेतल्याचे समोर आल्यास मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊन दोन वर्षांचा तुरुंगवास व २० ते ५० हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.
बालकामगार ठेवण्यास सक्त मनाई
१४ वर्षांखालील मुलांना सर्वच व्यवसाय व प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. १४ ते १८ वर्षांखालील किशोरवयीन मुलांना कामावर ठेवणे हा फौजदारी गुन्हा आहे.
५० हजारांचा दंड, दोन वर्षे तुरुंगात
बालकामगार प्रतिबंधित कायद्यानुसार फौजदारी गुन्ह्यासाठी सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची किंवा किमान २० ते ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.
कामगार अधिकारी कार्यालयाकडून पाहणी
प्रत्येक महिन्यात बालक कामगार अधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यात तपासणी केली जात असते. यावेळी एखादा बालकामगार काम करताना आढळल्यास संबंधित मालकावर फौजदारी गुन्हा व दंडात्मक कारवाई केली जाते.
लहान मुलांना कामावर ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेणे कायद्याने गुन्हा आहे. असा प्रकार आढळल्यास फौजदारी गुन्हा व दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे कुणीही बालकामगार कामावर ठेवू नये. कुठेही असा प्रकार आढळल्यास कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा.