अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
विसापूर :- होत्याचं नव्हतं झालं असे जे म्हणतात, अगदी तशाच घटनेचा सामना विसापूर येथील जावेद शेख कुटुंबीयासोबत घडला. काका-काकू उमरा यात्रेसाठी जाणार होते. त्यासाठी त्यांनी आपल्या ताडाली (चंद्रपूर) येथील दर्यावर न्याज कार्यक्रम ठेवला. सगळे नातेवाईक आनंदात होते. कार्यक्रम आटोपून अॅड. जावेद शेख (४९) पत्नी व मुलांसोबत विसापूर येथे घरी आले. मात्र त्यांना रात्री रविवारी हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
अनेकांचे खटले लढवितानाच अॅड. जावेद शेख यांच्या जीवन प्रवासाचा खटला मात्र अर्ध्यावरच संपला. उमरा यात्रेला जाणाऱ्या नातेवाइकांना सार करणाऱ्या कुटुंबीयावर जावेद यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्याची दुर्दैवी वेळ आली. अॅड. जावेद शेख यांनी विसापूर येथील चिंतामणी विद्यालयात काही काळ नोकरी केली. त्यावेळी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि न्याय क्षेत्रात आवड असल्याने त्यांना चंद्रपूर येथे सराव सुरू केला. दरम्यान, शिक्षिका असलेल्या नाजनिन सोबत विवाह केला. परंतु गावाशी नाळ त्यांनी जोडूनच ठेवली होती. विसापूर येथे
होणाऱ्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी होत होते. मात्र रविवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पत्नीने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना खासगी रुग्णालयात हलविले; परंतु जीवन प्रवासाचा खटला अॅड. जावेदला अर्ध्यावरच सोडावा लागला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई, बहीण, दोन भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर विसापूर येथील मुस्लिम कब्रस्तानात रविवार दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.