Home राष्ट्रीय लक्षवेधी:- स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी यासाठी फासावर गेलेत का?

लक्षवेधी:- स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी यासाठी फासावर गेलेत का?

लोकशाहीच्या चिंधड्या उडविल्या जातं असतांना जनतेला स्वातंत्र्याच्या उत्सव करण्याचे फर्मान कशासाठी?

लक्षवेधी:-

“ हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एकदिन, हो हो मनमे है विश्वास, हम होंगे कामयाब एकदिन” म्हणत इथल्या क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले बलिदान दिले, लाखों संसार उध्वस्त झाले, कुणाचा मुलगा या लढ्यात शाहिद झाला तर कुणाचा पती हिरावून घेतला, कुणाला गोळ्या घालून मारण्यात आले तर कुणाला फासावर चढविल्या गेले त्या क्रांतीकारकांच्या त्याग व बलिदानाने हे स्वातंत्र्य मिळालं पण भारताला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा सर्वसामान्य जनतेवर त्याच गुलमागिरीच्या इंग्रज राजवटीसारखे अन्याय केले जातं आहे, त्याच इंग्रजकालीन कायद्याच्या आडो शाने शेतकऱ्यांचे आंदोलन तुडविल्या जातं आहे, त्या आंदोलनात 700 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या एक प्रकारे हत्त्या केल्या जातात, गरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे सोडून अमीर उदधोगपतीचे 16 लाख कोटीचे कर्ज माफ केल्या जातं आहे, पीक विमा कंपन्याना सरकार पैसे देतात मात्र शेतकऱ्यांना शेत पिकांच्या विम्याचे पैसे मिळतं नाही, पोलीस व महसूल प्रशासनाकडून गरिबांना न्याय मिळतं नाही, पर्यायाने ते आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत असतात, श्रीमंत मात्र पैसे देऊन गुन्हे करूनही मोकाट दिसतात, पैसे दिल्याशिवाय कुठल्याही सरकारी कार्यालयात काम होत नाही, याबाबत वरिष्ठाकडे तक्रार केल्यानंतर तक्रारकर्त्यांना धमक्या येतात, जणू सगळी प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचारच्या विळख्यात सापडली की काय? अशी स्थिती असतांना मग स्वातंत्र्य मिळालं नेमकं कुणाला? असा प्रश्न पडतो, दरम्यान स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी हसत हसत फासावर गेले त्या क्रांतिकारकांना माहीत असतं की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलेच राजकीय नेते व सत्ताधारी असा लोकशाहीचा गळा कापत आहे तर कदाचित त्यांनी स्वातंत्र्याचा लढाच उभारला नसता, आजची स्थिती बघून त्यांना वाटतं असेल की आम्ही अशा भ्रष्ट आणि राष्ट्रद्रोही नेत्यांना सत्ता मिळावी म्हणून फासावर गेलोय का? हा प्रश्न त्यांना पडला असता, त्यामुळे स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर जरा याचे चिंतन करणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगतसिंग राजगुरु सुखदेव, टिळक, गांधी, पटेल, सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या नेतृत्वाखाली अनेक जण स्वातंत्र्याच्या लढाईत लढले, त्यापैकी अनेकांना फाशी देण्यात आली तर काही क्रांतिकारकांना गोळया घालून ठार करण्यात आलं, आज त्यांच्या त्या बलिदानाने आपणांस स्वातंत्र्य मिळालं पण सर्वसामान्य जनतेच्या जीवनात यांमुळं काहीही फरक पडला का? तर काहीही फरक पडला नाही, कारण तेंव्हा गोरे इंग्रज अन्याय करत होते आता सत्ताधारी काळे देशी इंग्रज सामान्य जनतेवर अन्याय करत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पुर्व संध्येला पंडित नेहरुंनी दिलेल्या भाषणात भारताने स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्षमयी प्रवास उलगडला होता आणि त्याबरोबरच भारताने आपलं स्वातंत्र्य परत मिळवल्याचं जगाला सागितलं.

सरकारचा सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा?

खरं तर भारतात असलेल्या सांस्कृतिक तसेच धार्मिक विविधतेमुळे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांनी भारत हा देश एकसंध राहणार नाही असे भाकित वर्तवले होते. परंतू विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ठय ठरले आणि आज 78 व्या वर्षाच्या स्वातंत्र्यतोत्तर वाटचालीत भारताच्या एकात्मतेला कुठेही तडे गेले नाहीत. (अपवाद काही धार्मिक संघटना) भारताने तंत्रज्ञान, विज्ञान, शेती, शिक्षण असा विविध क्षेत्रात प्रगती केली. आज भारताकडे स्वत: चा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं म्हटलं जातं. पण आज देशात ज्या पद्धतीने सरकार चाललंय ते भारताला जणू अराजकतेकडे घेऊन जात आहे असे जणू वाटायला लागले आहे. या देशात महात्मा गांधीच्या सत्याग्रही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानी पाकिस्तानी संबोधले जाते, त्यांच्या घटनादत्त अधिकाराला पायदळी तुडवल्या जात आहे. मोठमोठी आश्वासने देवून शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देऊ म्हणणाऱ्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान मूल्य सुद्धा दिल्या जात नाही. सरकारी संस्थांचे खाजगीकरण करून सरकारी नौकऱ्या संपवल्या जात आहे. देशातील ब्यांका लुटणाऱ्यांना सरकार कडून सरक्षण मिळतंय आणि सर्वसामान्य जनतेकडून सक्तीची कर्ज वसुली होतेय. बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढून महागाई आपली सर्वोच्य सीमा ओलांडत आहे, सरकार पेट्रोल डिझेल व घरगुती गैस च्या किमती वाढवून जणू सर्वसामान्य जनतेच्या खिशात दरोडा टाकत आहे. त्यामुळे एकेकाळी सुखी संपन्न समजला जाणारा देश आता राजकीय हिटलरशाही मुळे रसातळाला जाणार असे संकेत मिळत आहे, मग स्वातंत्र्य मिळवून आपण साध्य का केलं? हेच समजायला मार्ग नाही, खरं पाहता इंग्रजांनी देशात रेल्वे आणली देशात सुख सुविधा व इतर प्रशासन निर्मिती केल्या व त्यासाठी मोठ्या वास्तू तयार केल्या,आजही त्याच वास्तूत आपले प्रशासन चालत आहे. त्यामुळे भारतीय सत्ताधारी ज्या पद्धतीने देशात प्रगती होत असल्याच्या थापा मारताहेत त्या मानाने भारत विविध समस्यांनी वेढला गेला आहे. स्वातंत्र्याची खूप मोठी किंमत आपण दिली आहे. ब्रिटिश राजवटीतून आपण कधीच मुक्त झालो. पण महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार, स्वैराचार यात मात्र अडकलो आणि यातून दिवसेंदिवस बाहेर पडणं कठीण होत चाललयं. परदेशाशी लढणं सोपं आहे पण स्वकियांशी तितकच कठीण हे आता स्वातंत्र्य प्राप्तीच्या 78 वर्षानंतर कळायला लागलं आहे.

स्वातंत्र्य दिन म्हणजे बैंक हॉलिडे?

आपल्या देशात महान आणि तडफदार नेत्यांचा राजकीय इतिहास आहे. पण खेद याचा वाटतो की, या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची वेळ आली आहे, कारण आज आपल्या देशात नेत्यांचा व शासन प्रशासनाचा भ्रष्टाचार एवढा बोकळला आहे की स्टॅम्प पेपरपासून ते चारा घोटाळा, राफेल पासून तर नोटबंदी चा घोटाळा या सारख्या अनेक घोटाळ्यांनी राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालून आपली घोटाळ्यांची परंपरा सुरू असणे ही अत्यंत शरमेची बाब आहे. घोट्याळ्यांची ही व्यापकता आणि विविधता राखण्यात मात्र या नेत्यांनी सातत्य राखलं. राष्ट्रपिता गांधीजींच्या अहिंसेच्या चळवळीपुढे ब्रिटिशांनाही झूकावं लागलं. गांधीजींच्या तत्वज्ञानाचा जगभरात आजही पुरस्कार केला जातो. पण आज त्याच गांधीजींच्या देशात त्यांच्याच तत्वज्ञानावर आधारलेलं शेतकऱ्यांच आंदोलन चिरडलं जातं ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद यांची झळ बसणारा सामान्य माणूस बोथट झाला आहे. किती आणि कोणाला प्रतिकार करणार म्हणून एकतर सहन करणं नाहीतर विसरणं असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. याशिवाय ते जगूच शकत नाही. हिंसाचार दररोज होताना दिसत असतो. देशातल्या जनेतेच्या सहनशक्तीला खरच दाद दयायला हवी. आपल्या देशातल्या राजकारण्यांना जनतेचे प्रश्न सोडविण्याची मानसिकता आहे का? असा प्रश्न समूह संपर्क माध्यमातून लोक विचारु लागले आहेत. आर्थिक महासत्तेची स्वप्न बघणार्‍या भारतात दारिद्रय रेषेखालील जनेतेला अन्न, निवारा या जीवनाश्यक गोष्टीची भ्रांत आहे. आपल्या तिरंग्यातील तीन रंग शांतता, सामर्थ्य, सुबत्ता यांचे प्रतिक आहेत. भगवा सामर्थ्याचं, पाढंरा शांततेचं आणि हिरवा सुबत्तेचं. आज तिरंगा फडकवताना मनात येतं की खरचं भारतात शांती आहे? महासत्ता बनण्याचे सामर्थ्य आहे का? शेतकर्‍यांच्या आत्महत्या होणार्‍या कृषीप्रधान भारतात सुबत्ता आहे का ? खरं तर आज स्वातंत्र्य दिन नागरिकांसाठी बॅंक हॉलिडे झाला आहे. आजचे स्वातंत्र्य यथेच्छ उपभोगणा-या एकविसाव्या शतकातील भारतीयांना स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा देताना हा केवळ सुटीचा दिवस नाहीतर देशाला आणखी विकसित करण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे याची जाणिव द्यायला हवी. कारण आपण स्वराज्य मिळवले पण सुराज्य मिळवणे अजून बाकी आहे. हा देश जणू सामाजिक आर्थिक आणि राजकीय गुलामगिरीत अडकून जगातआपल्या लाचारीची लक्तरे वेशीवर टांगत आहे, त्यामुळे लोकशाहीच्या चिंधड्या उडविणाऱ्या व भ्रष्टाचार करून सत्ता भोगणाऱ्या नेत्यांसाठी व स्वातंत्र्याच्या घोषणा देऊन त्याआडून देशद्रोह करण्यासाठी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी फासावर गेले का? असा प्रश्न पडतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here