शहर व खेड्यातील अनेक सामाजिक राजकीय मान्यवरांचे या साखळी उपोषण आंदोलनाला समर्थन,
उद्या निघणार रेल्वे स्टेशनं प्रशासन कार्यालयावर मोर्चा. आमरण उपोषणाचा इशारा.
वरोरा प्रतिनिधी :-
वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांच्या नेतृत्वाखाली खेमचंद नेरकर, अशोक बावणे आणि प्रवीण गंधारे यांनी मुंबई व इतर राज्यात जाणाऱ्या रेल्वे चा रेल्वे थांबा वरोरा भद्रावती येथील रेल्वे स्टेशनवर द्यावा या मागणीसाठी वरोरा उप विभागीय कार्यालयासमोर मागील पाच दिवसापासून साखळी उपोषणास सुरुवात केली असून समाजाच्या विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी, समाजसेवकांनी व जनप्रतिनिधींनी उपोषण मंडपाला भेट देऊन तसेच भ्रमणध्वनीद्वारे जाहीर पाठिंबा दिला आहे, काल जेष्ठ वकील अँड पुरुषोत्तम सातपुते, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, भाजप नेते रमेश राजुरकर व इतर मान्यवरांनी भेटी दिल्या, मात्र रेल्वे व स्थानिक प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने उद्या शनिवारला साखळी उपोषण आंदोलन करणारे कार्यकर्ते व शहरातील मान्यवर यांचा रेल्वे स्टेशन वरोरा येथील कार्यालयावर धडकणार आहे.
मागील सुमारे १५ वर्षांपासून रेल्वे प्रवासी संघ तसेच वरोऱ्यातील जागरूक नागरिक रेल्वे संबंधित विविध मागण्या शासनदरबारी मांडत आले आहेत. विविध वर्तमानपत्रांच्या बातमीदारांनी देखील वेळोवेळी प्रवाशांच्या समस्या पोटतिडकीने वर्तमानपत्रांत मांडून सत्ताधाऱ्यांचे, जनप्रतिनिधींचे व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.परंतु अपवाद वगळता प्रवासी संघाच्या पत्राला उत्तर देण्याचे साधे सौजन्यही दाखविण्यात आले नाही. विविध एक्सप्रेस गाड्यांचा थांबा वरोरा येथे मिळावा , कोरोना संक्रमण काळात रद्द केलेल्या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू कराव्या,बल्लारशहा ते पुणे व मुंबईसाठी दररोज एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी, बल्लारशहा ते नागपूर,वर्धा, अमरावती, शेगावसाठी इंटरसिटी एक्सप्रेस सुरू करावी, बल्लारशहा ते हावडा नवीन एक्सप्रेस सुरू करावी,रेल्वे स्टेशनवर डिस्प्ले बोर्ड, पोजिशन इंडिकेटर लावावे, स्वयंचलित पायऱ्या व लिफ्टची सोय व्हावी,वरोरा स्टेशनच्या पश्चिमेस नवीन तिकीट घर सुरू करावे,स्टेशनवर दुसरा फूट ओव्हर ब्रिज बनविण्यात यावा,नागपूर-जबलपूर एक्सप्रेस चा विस्तार बल्लारशहापर्यंत करावा,बल्लारशहा ते वर्धा मेमु सायंकाळी सहा ऐवजी पाच वाजता सोडण्यात यावी ,अशा एकूण १२ मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू आहे. यात विशेष बाब ही की,रेल्वे प्रशासनाने हुकूमशाही पध्दतीने मागणीनुसार विविध एक्सप्रेसना थांबा तर दिला नाहीच उलट ज्या गाड्या सुरू होत्या त्याही बंद करण्याचा उद्दामपणा केला आहे. परिणामतः सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापाऱ्यांना बसने प्रवास करण्याची नामुष्की ओढवली असून ते आर्थिकदृष्ट्या पिळल्या जात आहेत. एकंदरित नागरिकांना नाहक शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.