Home मुंबई महत्वाची बातमी:- महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसह ग्रामपंचायत निवडणुका फेब्रुवारीत?

महत्वाची बातमी:- महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीसह ग्रामपंचायत निवडणुका फेब्रुवारीत?

 

कोरोना संख्या कमी झाल्यास लवकरच निवडणुकीचे बीगुल वाजणार.

महाराष्ट्रनामा :-

कोरोनाच्या लॉक डाऊन काळात बिहार राज्यात झालेल्या निवडणुका आटोपल्यावर आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकललेल्या १४ हजार ग्रामपंचायतींसह मुदत संपलेल्या किंवा लवकरच संपणाऱ्या कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद आणि कोल्हापूर या पाच महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूरसह १५ ते २० नगरपालिका, काही नगरपंचायतिच्या निवडणुका येत्या फेब्रुवारीत घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.

कोरोना काळात बिहार विधानसभा निवडणूक घेण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे. परंतु करोना रुग्णसंख्या आटोक्यात आली तरच फेब्रुवारीत निवडणुका घेण्याचे नियोजन आहे. असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले.

कोरोनामळे एप्रिल ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या आणि नवनिर्मित अशा १४ हजार २३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या अद्ययावत केल्या जात आहेत. विधानसभा मतदारसंघाच्या २५ सप्टेंबर रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य़ धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील. हरकती व सूचनांसंदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील, असे मदान यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here