आफ्रोहचे लढवय्ये चंद्रभान सोनुने मंत्रालयासमोर दाखल होताच मंत्रालयाच्या मेन गेट समोरून पोलिसांनी केली अटक.
मुंबई 10 डिसेंबर:-
जागतिक मानवाधिकार दिवस. मुख्यतः जीवन आणि स्वातंत्र्याचा अधिकार, गुलामी आणि यातनांतून मुक्तीचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार.
कोणत्याही व्यक्तीला भेदभाव न करता ‘या’ अधिकारांना प्राप्त करण्याचा अधिकार आहे. हा मानवाधिकार दिवस सर्वत्र साजरा होत असताना… कर्मचा-यांच्या न्याय-हक्कासाठी लढणा-या आॅर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन ( आफ्रोह) या संघटनेचा लढवय्या खंदा कार्यकर्ता – राज्यकार्यकारिणी सदस्य, बुलडाणा जिल्हा सचिव चंद्रभान सोनुने यांनी या जागतिक मानवी हक्क दिनी’च मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा महाराष्ट्र शासनाला दिला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या 21 डिसेंबर 2019 च्या शासनाने घेतलेल्या निर्णयाला वर्ष होत आले तरीही या शासन निर्णयातील मुद्दा क्र.4.2 नुसार _बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बॅकेच्या 13 कर्मचा-यांना अधिसंख्य पदाच्या नेमणूकीचे आदेश न दिल्याने व न्याय मिळत नसल्याने आजच्या दिवशी मंत्रालयासमोरच आत्मदहनाचा इशारा दिला.
याबाबतचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना दि.23 /11/2020 रोजी पाठविण्यात आले होते. मा.मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे, सहकार व पणन मंत्री श्री.बाळासाहेब पाटील, पालकमंत्री डाॅ.राजेंद्र शिंगणे,गृहराज्यमंत्री श्री.सतेज पाटील , प्रधान सचिव, सहकार व पणन यांच्यासह जिल्हाधिकारी बुलडाणा, जिल्हा उपनिबंधक व अध्यक्ष जिल्हा बॅक प्राधिकृत समिती बुलडाणा यांनाही या निवेदनाच्या प्रती सादर केल्या होत्या.
मा.सर्वोच्च न्यायालयाच्या 6 जुलै 2017 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी 21 डिसेंबर 2019 चा शासन निर्णय काढण्यात आला आहे. याच शासन निर्णयाची अंमलबजावणी करून मंत्रालयापासून तर जिल्हास्तरावरील सर्वच कार्यालयातील कर्मचा-यांना तात्पुरत्या स्वरूपातील अधिसंख्य
पदावर वर्ग करण्यात आले आहे.मात्र याच शासन निर्णयातील मुद्दा क्र.4.2 नुसार बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बॅकथेतील यापूर्वी सेवासमाप्त करण्यात आलेल्या 13 कर्मचा-यांना वर्ष होत आले तरीही बॅकेचे प्रशासन व सहकार विभागाचे अधिकारी अधिसंख्यपदावर नेमणूकीचे आदेश देण्याबाबत टाळाटाळ व कुचराई करीत आहेत.
या अन्यायाविरूद्ध चंद्रभान सोनुने यांनी यापूर्वी एकदा आत्मदहनाचा इशारा तसेच 5 दिवसाचे आमरण उपोषण केले होते.मात्र बुलडाणा बॅकेला व सहकार खात्याला जाग आली नाही. ‘ *मानवतेच्या दृष्टीकोनातून* ‘ घेतलेल्या निर्णयानुसार या 13 कर्मचा-यांना गेले वर्षभर न्याय मिळू शकला नाही, हे या महाराष्ट्राचे दुर्दैव!
शेवटी या अन्यायाच्या निषेधार्थ व या 13 कर्मचा-यांच्या ‘मानवी हक्काचे हनन’ होत असल्यामुळे त्यांच्या वतीने
चंद्रभान सोनुने यांनी ‘मानवी हक्क दिनी’च मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला. तरीही ना जिल्हा बॅकेच्या अधिका-यांना पाझर फुटला..ना सहकार खात्याच्या अधिका-यांना. मंत्रालयातील ‘मानवतेचा दृष्टीकोण’ या जिल्हास्तरीय अधिका-यांपर्यंत तर पाझरलाच नाही.मात्र आज मंत्रालयाच्या दारात सोनुने येऊन उभे ठाकले. गेले आठ दिवस पोलीस यंत्रणा सोनुनेंना शोध-शोध शोधताहेत..पण सोनुनेंना ‘न्याय मिळण्यासाठीचा अहवाल’ त्यांनी मंत्रालयात पाठवला काय? बुलडाणा जिल्हा बॅक व उपनिबंधक यांनी आपले हात झटकले. प्रत्येकानेच ‘ मानवतेचा दृष्टीकोण’ पायदळी तुडविला!सोनुनेनी बुलडाण्यात यापूर्वी दिलेला आत्मदहनाचा इशारा.भर पावसात केलेले 5 दिवसाचे आमरण उपोषण.. या 13 कर्मचा-यांना न्याय मिळवून देऊ शकले नाही.आज जागतिक मानवाधिकाराच्या दिनीच सोनुने मंत्रालयासमोर पोहचले..आत्मदहनासाठी..!
स्वतःसह 12 कर्मचा-यांना न्याय मिळावा म्हणून जिवावर उदार होऊन सोनुने राज्यकर्त्यांच्या दारात पोहचले. पण त्यांना मंत्रालयाच्या गेट समोरून पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे शासनकर्ते व राज्यकर्ते ‘आत्मदहना’ची घटना घडण्याची वाट पाहत आहेत काय? तेही या मानव हक्क दिनीच? हा अतिशय गंभीर प्रश्न आहे