स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
कोरोना काळात शासकिय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ओलांडून गेली. या उमेदवारांची शासकीय सेवेची दारे बंद झाली होती. पण राज्य सरकारने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळ विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी काढला आहे.
शासन निर्णयात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात १ मार्च २०२० पासून जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन २५ एप्रिल २०१६च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा, १ मार्च २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील, त्या जाहिरातींसाठी “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.