चार महिन्यांपासून गावांत पाणी पुरवठा बंद असल्याने महिलांचे अभिनव आंदोलन.
वरोरा प्रतिनिधी :-
तालुक्यातील बोरी या गावाच्या नळ योजनेचे ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी तीन तेरा वाजवले असल्याने चार महिन्यांपासून गावांत पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे गावातील महिलांना दैनंदिन पाण्याची गरज बघता त्या संतापल्याने त्यांनी आज दिनांक २९ सप्टेंबरला दुपारी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून अभिनव आंदोलन केले आहे.
मागील चार महिन्यांपासून नळ योजना बंद आहे पण सरपंच व सदस्य यांनी याबाबत कुठलाही तोडगा काढला नाही. पाणी पुरवठा करण्यासाठी जे ट्रान्सफर पाहीजे ते घेतले नाही शिवाय इलेक्ट्रिक बिल सुद्धा भरले नाही त्यामुळे गावाच्या हक्काचे पाणी देण्यास ग्रामपंचायत सत्ताधारी कुचकामी ठरले. अगोदरच गावांत संततधार पावसाने रोगराई निर्माण झाली असताना सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाने आरोग्याच्या द्रुष्टीने कुठलीही उपाययोजना केली नाही. नाल्यात पाणी भरले व डास तयार झाले त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आणि आता पिण्याचे पाणीच मिळत नसल्याने महिलांनी करायचे काय ? हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर पडल्याने त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून सत्ताधारी गटाविरुद्ध अभिनव आंदोलन केले. दरम्यान गावांत सुरू झालेला हा गोंधळ थांबविण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. आता या आंदोलनाची दखल ग्रामपंचायत प्रशासन घेणार की पुन्हा महिलांना आंदोलन करण्याची वेळ येईल हा काळच ठरवेल.